जिल्हा परिषद गोंधळात
By Admin | Updated: June 20, 2014 00:37 IST2014-06-20T00:32:04+5:302014-06-20T00:37:47+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित प्राथमिक शिक्षकांच्या बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी नाशिकच्या विभागीय विशेष चौकशी अधिकाऱ्यांना एकाच आरोपातील ७६ शिक्षकांना वेगवेगळा न्याय दिलेला आहे.

जिल्हा परिषद गोंधळात
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित प्राथमिक शिक्षकांच्या बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी नाशिकच्या विभागीय विशेष चौकशी अधिकाऱ्यांना एकाच आरोपातील ७६ शिक्षकांना वेगवेगळा न्याय दिलेला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन गोंधळले असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल पत्र पाठवून विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन घेणार आहेत.
दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी बनावट अपंग प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला सादर केले. हे प्रमाणपत्र चौकशीनंतर बनावट असल्याचे सिध्द झाले होते. जिल्हा परिषद प्रशासनाने या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि पुण्याच्या ससून रुग्णालयातून करून घेतली होती. त्यात शिक्षकांची बनवेगिरी सिध्द झाली. सुरूवातीला या शिक्षकांवर कारवाई न करण्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्यावर मोठा दबाब होता.
मात्र, त्यांनी तो झुगारून संबंधीत शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासोबत नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात ७६ शिक्षकांवर एक सारखा आरोप होता. यामुळे चौकशीत एकतर हे सर्व शिक्षक दोषी अथवा निर्दाेष ठरणे आवश्यक होते. मात्र, चौकशी अधिकाऱ्यांनी सुरूवातीला १७ शिक्षकांवर दोष सिध्द झाला असल्याचा अहवाल दिला आहे.
त्यानंतर ४८ शिक्षकांवर आरोप सिध्द होत नसल्याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केलेला आहे. यामुळे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. एकच आरोप असणारे १७ शिक्षक दोषी उर्वरित ४८ यांना क्लिनचिट तर ११ शिक्षकांची चौकशी होणे बाकी आहे. यामुळे या प्रकरणी कोणावर कशी कारवाई करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरू आहे. या शिक्षकांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर अशी कोणती जादू केली यामुळे या शिक्षकांवरील दोष सिध्द होत नाही, कळत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेत जिल्हास्तरावर दोषी ठरलेले अनेक कर्मचारी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात क्लिनचिट मिळालेली आहे. आता शिक्षकांची चौकशी करणारे अधिकारीच त्यावेळी असल्याचे सांगण्यात येते़ (प्रतिनिधी)
तिघे निर्दोष; उर्वरित दोषी
कोणत्या शिक्षकांवर कारवाई करावी, कोणावर करू नयेत याबाबत गोंधळ आहे. या प्रकरणात तीन शिक्षकांना अपंग कल्याण आयुक्तांनी निर्दाेष सिध्द केलेले आहे. उर्वरित शिक्षक दोषी असताना त्यांच्यावरील आरोप का सिध्द होत नाहीत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, येत्या २५ तारखेला विभागीय आयुक्त एकनाथ डौले जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्हा परिषदेची खाते अंतर्गत तपासणी करणार आहेत. यावेळी त्यांच्याकानावर ही बाब घालण्यात येणार आहे.
या बनावट अपंग शिक्षक प्रमाणपत्र प्रकरणी विभागीय आयुक्त यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. एकाच आरोपातील काही शिक्षकांवर आरोप तर काहींवर आरोप सिध्द होत नसल्याचा अहवाल आलेला आहे. यामुळे विभागीय आयुक्तांना पत्र पाठविण्यात येणार आहे.
-शैलेश नवाल,
मुख्य कार्यकारी अधिकारी