कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम रखडले, तरुणाने केले खड्ड्यात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:28+5:302021-07-16T04:15:28+5:30
करंजी : आंदोलन म्हटले की डोळ्यासमोर अनेक जणांनी एकत्र येऊन निषेध नोंदविल्याच्या घटना समोर येतात. मात्र करंजी (ता.पाथर्डी) येथील ...

कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम रखडले, तरुणाने केले खड्ड्यात वृक्षारोपण
करंजी : आंदोलन म्हटले की डोळ्यासमोर अनेक जणांनी एकत्र येऊन निषेध नोंदविल्याच्या घटना समोर येतात. मात्र करंजी (ता.पाथर्डी) येथील तरुणाने गुरुवारी सकाळी कल्याण-निर्मळ महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा निषेध एकट्यानेच रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून नोंदविला.
कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम गेल्या ३-४ वर्षांपासून रखडले आहे. नगरवरून पाथर्डीकडे जाणाऱ्या या महामार्गावरील करंजीपासून ते मेहेकरीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. या महामार्गावरील अपघातात शंभरच्यावर वाहन चालकांचे बळी गेले आहेत. या महामार्गाचे काम सुरू करावे म्हणून अनेकवेळा रास्ता-रोको, उपोषण, मोर्चे आदी आंदोलने झाली. दरवर्षी आंदोलनातील माणसे बदलली मात्र रस्त्याची अवस्था बदलली नाही. अतिशय संथ गतीने या महामार्गाचे काम चालू असून महिन्यातून एखादा किलोमीटर शक्य झाले तर करण्यात येते.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर तलावासारखे पाणी साचल्याने अपघात झाला नाही, असा एकही दिवस जात नाही.
या महामार्गाचे रखडलेले काम सुरू करून लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी व कोरोनाचे संकट लक्षात घेत करंजी येथील विवेक मोरे या तरुणाने लोक जमवून आंदोलन करण्यापेक्षा एकट्यानेच आंदोलन केले.
------
कल्याण-निर्मळ महामार्गाचे काम पुन्हा एकदा रखडले आहे. या रस्त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. प्रशासन आणखी किती बळी घेणार? त्यामुळे या महामार्गाचे काम त्वरित सुरू करावे, यासाठी हे आंदोलन केले.
-विवेक मोरे,
अध्यक्ष, छत्रपती तरुण मंडळ, करंजी
-----
फोटो पॅलेटला आहे.