टँकरसाठी महिला रस्त्यावर
By Admin | Updated: July 4, 2016 23:47 IST2016-07-04T23:41:12+5:302016-07-04T23:47:57+5:30
शेवगाव : पाणी टंचाईची तीव्रता कायम असताना परिसरात पडलेल्या तुरळक पावसावर प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. पाणी टंचाईचे संकट कायम असल्याने

टँकरसाठी महिला रस्त्यावर
शेवगाव : पाणी टंचाईची तीव्रता कायम असताना परिसरात पडलेल्या तुरळक पावसावर प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. पाणी टंचाईचे संकट कायम असल्याने टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी परिसरातील ग्रामस्थांनी शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा येथे सोमवारी तब्बल ३ तास रास्ता रोको करून राज्य मार्गावरील वाहतूक रोखून धरली. या आंदोलनात रिकामे हंडे घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शेवगाव तालुक्यात जून महिन्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. मात्र दहिगाव ने।, भातकुडगाव परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र प्रशासनाने तुरळक पावसावर संपूर्ण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद केल्याची कार्यवाही केल्याने या परिसरातील जनतेत नाराजी आहे. प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात न घेता टँकर बंद करण्याची घाई केल्याने मुदतवाढीचे प्रस्ताव तातडीने दाखल करून पिण्याच्या पाण्याचे टँकर पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. रामभाऊ साळवे, भाऊसाहेब सामृत, शंकर नारळकर यांनी दिली. या आंदोलनात भायगावच्या सरपंच मनिषा आढाव, अशोक दुकळे, शहाराम आगळे, एकनाथ काळे, श्रीराम खरड, संतोष मेरड, आबासाहेब काळे, आत्माराम तोंडकर, पार्वतीबाई नेहुल,आशा घुले, नर्मदा जगधने आदी प्रमख कार्यकर्ते यावेळी सहकारी झाले होते. प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.सुरेश पाटेकर यांनी आंदोलकांशी व त्यानंतर तहसीलदार दादासाहेब गिते यांच्याशी संपर्क साधून मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे जाहीर केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. मात्र मुदतवाढीच्या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार संयोजक रामभाऊ साळवे यांनी जाहीर केला.
(तालुका प्रतिनिधी)