सोशल मीडियासाठी हवा ‘मार्ग’दर्शक

By Admin | Updated: June 15, 2014 00:32 IST2014-06-14T23:17:19+5:302014-06-15T00:32:16+5:30

अहमदनगर : सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचा सद््उपयोग आणि दुरूपयोग वापरकर्त्यांवर अवलंबून असतो...

Wind 'guide for social media | सोशल मीडियासाठी हवा ‘मार्ग’दर्शक

सोशल मीडियासाठी हवा ‘मार्ग’दर्शक

अहमदनगर : सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचा सद््उपयोग आणि दुरूपयोग वापरकर्त्यांवर अवलंबून असतो... त्यावर भावना भडकविणारा मजकूर प्रसिद्ध करून विकृत लोक दंगल घडवून आणीत आहेत, तोच त्यांचा उद्देश आहे... युजर्सनेही स्वत: आचार संहिता घालून घ्यायला हवी... खरे तर युजर्स हे वापराबाबत अज्ञानी आहेत... त्यांना ‘मार्ग’दर्शन आणि कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज आहे...
ही आहेत सोशल मीडिया आणि त्यावरील विकृतीबाबतची तज्ज्ञांची मते. ‘लोकमत’ने ही परिचर्चा आयोजित केली होती. यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक ढेकणे, सायबर सेलचे राहुल गायकवाड, न्यू आर्टस्मधील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वसंत देसले, बीबीए विभागप्रमुख प्रा.मंगेश वाघमारे, अशोकानंद कर्डिले महाराज हे सहभागी झाले होते. कोणतेही तंत्रज्ञान वाईट नसते. त्याला आपल्या जीवनात किती स्थान द्यायचे, हे प्रत्येकाने ठरवावे. आपल्याला कोणी तरी वापरून घेत आहे, हे युर्जसच्या निदर्शनास आल्यास विटंबनेसारखे प्रकार घडायचे नाहीत. सोशल मीडियातील ‘बदमाश कंपनीच्या’ उद्योगाला मीडियाच ब्रेक लावू शकतो, अशी अपेक्षा करण्यात आली. तज्ज्ञांनी मते मांडतानाच उपाययोजनाही सूचवल्या. आणि
हरवलेला मार्ग दाखविण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचा संकल्पही सोडला.
सोशल मीडियाने अबालवृद्धांच्या वैयक्तिक आयुष्यात शिरकाव केला आहे. स्वत:ची स्पेस हरवून बसले आहेत. विशेषत: तरूणाई या मीडियाच्या मोहात पडली आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉटस्अ‍ॅपचे लाखोंच्या घरात वापरकर्ते आहेत. नेमके हे व्यसन आहे की आणखी काही. याचा दुरूपयोग केल्यास कोणते कायदे आहेत, त्यामुळे काय शिक्षा होऊ शकते. एखाद्याची बदनामी कशामुळे केली जाते, ती कोण करतो, त्यामागची मानसिकता काय आहे. हे रोखता येऊ शकते का, त्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत. याबाबतचा उहापोह या परिचर्चेत करण्यात आला.
- संकलन : टीम लोकमत

सोशल मीडियाबाबत समाज अनभिज्ञ
विज्ञान वरदान आहे तसाच शाप. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचंही आहे. चांगली व वाईट अशा दोन्ही बाजू सोशल मीडियाला आहे. या माध्यामातून समाज मोठ्या प्रमाणात जोडला गेला. माहिती क्षणात इकडून तिकडे पोहचते. छोटे उद्योजक याचा वापर करून आपल्या उत्पादनाचं मार्केटिक करू शकतात या झाल्या चांगल्या बाजू. १२ ते १७ वयोगटातील मुलं सोशल मीडियाचा वापर करत आहे. मैदानात जाणे सोडून ते सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर खाते उघडताना संबंधित कंपनीच्या नियम, अटी कोणी वाचत नाही. त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती आपण या माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहच करत असतो. अफवा जलदगतीने पसरते. समाजावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो या वाईट बाजू सोशल मीडियाच्या आहेत. सोशल मीडियाचा वापर करत असताना नको त्या गोष्टी समोर दिसत असतात. आपण त्यालाच लाईक करतो. त्यामुळे वायफळ खर्च वाढलेला आहे. सोशल मीडिया हे व्यसन समाजाला जडलेलं आहे. त्याचा फायदा तसा तोटाही आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा विचार करून त्याचा वापर केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर केला जातो पण त्याच्या नियम, अटी कोणाला माहिती नाही. त्यामुळे समाज या मीडियासंदर्भात अनभिज्ञ आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरवरचा माणूस जोडला गेला आहे. पण त्यात स्वत:ची प्राईव्हसी थर्ड पार्टीला पोहचविली जात असल्याने तो प्राईव्हसी गमवून बसला आहे. नाण्याला जशा दोन बाजू असता तसाच प्रकार सोशल मीडियाच्या बाबतीत आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना प्रत्येकाने समजावून घेऊनच वापर केला पाहिजे.
-मंगेश वाघमारे, बीबीए विभागप्रमुख, न्यू आर्टस कॉलेज
वापरकर्त्याचे संस्कार महत्त्वाचे
सोशल मीडिया हा ज्ञानाचे भांडार झाले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरूषार्थासह सत्व, रज व तम हे गुणही सोशल मिडियावर उपलब्ध आहेत. मीडियाचा वापर करताना काय टाकावं अन् काय नको याचा विचार केला पाहिजे. तुम्ही जी पोस्ट करणार असेल ती शुध्द असेल पण समाजविरोधी असेल तर ती पोस्ट करू नये याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. शासनालाही मूल्यशिक्षण शिकविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वापरकर्त्यावर संस्कार होणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियाचा वापर करताना स्वातंत्र्य असावं पण ते बंधनात असलं पाहिजे. मर्यादीत स्वातंत्र्य शोभून दिसते. अमर्याद स्वातंत्र्याला शोभा नसते. तो राक्षसाप्रमाणे होईल. अन् मग तो अटोपण्यापलिकडे जाईल. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. याचा वापरकर्त्याने विचार केला पाहिजे.
-अशोकानंद कर्डिले, सोशल मीडियाचे अभ्यासक.
नियंत्रण महत्त्वाचे
माणसांचा मेंदू विकसीत होत आहे. त्याची आकलन क्षमता वाढत आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांवर संस्कार असणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या विकृतीवर कितीही संस्कार केले तरी त्या संस्कारावर त्याच्यातील रानटी वृत्ती मात करतेच. त्यामुळे त्याची विकृती घालविणे कठिण काम आहे. बोध आणि अबोध मन असे दोन प्रकार असतात. नीती, सदसदविवेकबुध्दी या समाजाशी निगडीत गोष्टी आहेत. अबोध मनावर बोध मनाचा ताबा असतो. अनामिकता प्रत्येकात असते. संधी मिळताच ती प्रकट होते. पूर्वी मसल पॉवर होती, आता बुध्दी पॉवर आली आहे. बौध्दीक पॉवरचा अनामिक मनावर ताबा असतो. हा ताबा कमी झाला की त्याचा अनामिक मन व्यक्त होत असते. सोशल मीडिया हे संवादाचे माध्यम आहे. तंत्रज्ञान हे मेंदूनेच विकसीत केले आहे. मेंदूवर नियंत्रण असले की माणूस नीट वागतो. त्यामुळे मेंदूवर नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे. रुढी, परंपरा, संस्कृती या लोकनियंत्रणात राहतात. माहिती घेण्या-देण्याची घाई झालेली आहे. कोणतीही खात्री न करता माहितीची देवाण-घेवाण केली जाते. एखाद्याने रिप्लाय केला नाही तर अबोध मनात वेगवेगळे विचार येतात. त्यामुळे मनावर संयम राहिलेला नाही. अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षा भंग झाला की मग अनामिक मनाला संधी मिळण्यास वाव मिळतो. काही विकृत माणसं समाजात विकृतपणा पसरवितात. त्याला अनेक बळी पडतात. त्यातून त्या विकृताला आनंद मिळत असतो. घरात बसून तो विकृतीचा आनंद घेत असतो. सोशल मीडियाच्या वापरावर घरातून नियंत्रण असणं महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष नसलं तरी अप्रत्यक्ष नियंत्रण असलं पाहिजे. सोशल मीडियाला मुक्त सोडल तर यादवी होईल.
- डॉ. वसंत देसले, मानसशास्त्र तज्ज्ञ
हे करा
सोशल मिडियावरती भावना भडकविणारे छायाचित्र आले तर त्याला लाइक करु नका. ज्या खात्यावर हे चित्र आले आहे त्या संबंधित खात्याच्या कंपनीला (फेसबुक व अन्य) तक्रार करण्याची सुविधा त्या छायाचित्राशेजारीच उपलब्ध असते. त्याचा युजर्सनी अवलंब करावा यामुळे सहआरोपी होण्यापासून सुटका होणे शक्य आहे.
प्रत्येक घटनेची खात्री करावी
पूर्वीच्या तुलनेत पिढीच्या बुध्यांकामध्ये किमान दहा टक्के वाढ झाली आहे. ज्याच्या हाती तलवार आहे, त्याने तिचा वापर कसा करायचा याला महत्त्व आहे. तसाच प्रकार सोशल मीडीयाचा आहे. वापर कसा करायचा हे वापरकर्त्याच्या हातात आहे. सुशिक्षित माणसंही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवतात, त्याची कुठे खात्री करत नाही. विशेष म्हणजे सुशिक्षित माणसांंनाच हे कळत नाही. व्हॉटसअप व फेसबुकवर आलेल्या कोणत्याच माहितीची खात्री केली जात नाही. नुकसान होणारी मालमत्ता ही माझीच आहे याचा विसर सगळ्यांनाच पडतो. माहिती तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरी प्रत्येक गोष्टीची खात्री करणे आवश्यक आहे. सोशल मीडीयावर अनेक खाते बनावट आहे. त्यावरून समाजाची माथी भडकविली जावू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची खात्री करणे आवश्यक आहे. व्हॉटसअप व टेलिग्राम हे पोस्टमनचे काम करतात. याचा संदेश त्याला पोहचविणे एवढेत त्याचे काम आहे. पूर्वीच्या काळी सोशल मीडिया नव्हता पण एसएमएस होता. आता तंत्रज्ञानात वाढ झाली. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्यासाठी झाला पाहिजे.
- राहुल गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
विकृतीला बळी पडणे टाळा...
समाजात सतप्रवत्ती व दुषप्रवृत्ती दोन्ही प्रकारची माणसं आहेत. विकृत माणसं फार थोडी आहेत. विकृताला संस्कृत बनविणे कठिण काम आहे. समाजही विकृताला टाळू शकत नाही. परंतु विकृत माणसं संस्कृत माणसांचा खांदा वापरतात. संस्कृत माणसं कोणत्याही गोष्टीची खात्री न करता विकृतांच्या कृत्त्याला बळी पडतात. समाजात विध्वंस झाला की विकृताला समाधान मिळते. त्याला जे पाहिजे होते ते यशस्वी झाल्याचा आनंद त्याचं विकृत मन घेत असतं याचं भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. सायबर जग आता अस्तित्वात आलं आहे. मनात भिती असेपर्यंत कोणताही माणूस काहीच करत नाही. कोणी बघणार नाही, काही होणार नाही, कोणी ओळखत नाही या मानसिकतेत तो काही चुका करतो. सोशल मीडियाचा वापर करताना तरुणपिढी आपल्या भविष्याचा विचार करत नाही. त्यामुळे या पिढीला मार्गदर्शनाची खरी गरज आहे. काही कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. आहे तो कायदा कणखरपणे राबविणे गरजेचे आहे. दोषी सापडून त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण त्याच्यासोबत आपण किती मुर्ख बनायचे याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सोशल मीडियाच्या वापराबाबत समाज जागृती होणे गरजेचे आहे. हे काम मीडियाने केले पाहिजे. चुकी करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. पण त्याने केलेल्या चुकीने समाजात विध्वंसक वृत्ती बळावणार असेल तर त्याची चूक समाजासमोर न आलेली योग्य राहते. विध्वंसक होणाऱ्या चुका समाजासमोर येऊ न देणे गरजेचे आहे.
- अशोक ढेकणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा

Web Title: Wind 'guide for social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.