बंदचे पत्र देणारे मगर कोण?
By Admin | Updated: June 17, 2014 00:34 IST2014-06-16T23:59:32+5:302014-06-17T00:34:52+5:30
अहमदनगर : शहर बससेवा बंद करण्याची नोटीस महापालिकेला देणारे दीपक मगर कोण? असा सवाल करत अभिकर्ता संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधीला

बंदचे पत्र देणारे मगर कोण?
अहमदनगर : शहर बससेवा बंद करण्याची नोटीस महापालिकेला देणारे दीपक मगर कोण? असा सवाल करत अभिकर्ता संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधीला बोलवा, नंतर काय ती भूमिका घेऊ, असा निर्णय स्थायी समितीच्या सभेत झाला. अधिकृत प्रतिनिधी नसल्याने समितीची सोमवारची सभा तहकूब ठेवण्यात आली असून मंगळवारी ती पुन्हा होणार आहे.
गत तीन वर्षापासून शहरात प्रसन्ना पर्पल ही अभिकर्ता संस्था शहर बससेवा चालवित आहे. संस्थेला तोटा असल्याने दरमहा ७ लाख रुपये नुकसान भरपाई व आठ बसेस इतरत्र हलविण्यास परवानगी या दोन विषयावर सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरूवातीस ज्येष्ठ सदस्य दीप चव्हाण यांनी शहर बससेवेच्या अरेरावीचा पाडा वाचला. महापालिकेने प्रसन्ना संस्थेशी करार केला आहे. करारावर रोहित परदेशी यांचे नाव आहे. करारनाम्यानुसार मगर यांचा महापालिकेशी काहीही संबंध नाही. तरीही ते महापालिकेला बससेवा बंद करण्याची नोटीस देतात. महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी धावाधाव करते. शहरात पाणी, आपत्कालीन यासह अनेक प्रश्न आहे. पण प्रशासन मात्र त्यासाठी धावाधाव करत नाही. महापालिका निवडणूक, लोकसभा निवडणूक आणि आता शाळेचा पहिला दिवस असे मोक्याचे दिवस पाहून संस्थेकडून बससेवा बंद करण्याची नोटीस दिली जाते. करारनाम्यात कुठेही भरपाई द्यावी असा उल्लेख नाही. मग भरपाई का द्यावी. तोट्याची शहानिशा केली नाही असे प्रश्न उपस्थित करून चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापालिकेला बंदचे पत्र देणाऱ्या मगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
२ लाख ९६ हजार रुपये नुकसान भरपाई महापालिका संस्थेला देत आहे. आता तो सात लाख नुकसान भरपाई मागत आहे. त्यापेक्षा महापालिकेने भाडोत्री वाहन घेऊन बससेवा चालवावी. फुकटात प्रवाशी ने-आण करावी, अशी मागणी सचिन जाधव यांनी केली.
करारनाम्यानुसार मगर यांना कोणतेही अधिकार नाहीत. रोहित परदेशी यांनी करार केला आहे. त्यांना निरोप देऊनही ते आले नाहीत. परदेशी यांना तातडीने बोलवून घ्या. तोपर्यंत सभा तहकूब करत आहे. तोपर्यंत शहर बससेवा बंद ठेवायची नाही असा निरोप द्या. सभेत निर्णय झाल्यानंतर पुढची भूमिका घ्या असा निरोप सभापती डागवाले यांनी संस्थेला पाठविण्याची सूचना केली.
(प्रतिनिधी)
ठरावाआधीच भरपाई ?
अभिकर्ता संस्थेला नुकसान भरपाई देण्याचा ठराव १५ आॅक्टोबर २०१३ ला महासभेत झाला. प्रशासनाने मात्र आॅगस्ट २०१३ मध्येच संस्थेला १५ लाख ६० हजार रुपये अदा केले आहेत. वर्कशॉप दुरुस्तीच्या हेडखाली हे पैसे देण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. दुरूस्तीच्या हेडखाली नुकसान भरपाई कशी देऊ शकता असा प्रश्न दीप चव्हाण यांनी उपस्थित केला. महापालिकेने संस्थेला सप्टेंबर २०१३ ला २ लाख ६० हजार, १४ नोव्हेंबर या एकाच दिवशी दोनदा साठ हजार रुपये आणि १९ नोव्हेंबरला २ लाख ९६ हजार रुपये दिले आहेत. हे पैसे वसुल करण्यासाठी अभिकर्ता संस्थेला नोटीस द्या. त्याने नकार दिला तर संबंधित अधिकाऱ्यांकडून ते पैसे वसुल करावेत अशी मागणी सभेत सदस्यांनी केली.
अभिकर्ता संस्थेने बससेवा बंद ठेवली तर प्रतिदिन एक हजार रुपये दंडाची तरतूद करारनाम्यात आहे. पण महापालिकेने संस्थेकडून एक रुपयांचाही दंड वसुल केलेला नाही. वास्तविक तोट्याच्या नावाखाली बससेवा गतवर्षी दोनदा बंद होती. याकडेही दीप चव्हाण यांनी लक्ष वेधले. सोमवारच्या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांची सविस्तर टिपण्णी प्रशासनाने मंगळवारच्या सभेसमोर मांडावी अशी सूचना सभापती किशोर डागवाले यांनी केली.