वारूळवाडी, तांदळी, अकोळनेर, घोसपुरी, शिराढोण बिनविरोधच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:22+5:302021-01-04T04:18:22+5:30
नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ हजार ८८५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत . सोमवारी ११ ते ३ ...

वारूळवाडी, तांदळी, अकोळनेर, घोसपुरी, शिराढोण बिनविरोधच्या मार्गावर
नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १ हजार ८८५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत . सोमवारी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तालुक्यातील आंबिलवाडी व वारूळवाडी या दोन गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यात जमा आहेत. शिराढोण, तांदळी वडगाव, दशमी गव्हाणमधील निम्म्याहूक अधिक जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित जागांवरील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अकोळनेर व घोसपुरी या दोन गावातही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला आहे.
आदर्शगाव हिवरेबाजार येथेही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ३० वर्षांपासून या गावातील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. खडकीतही बिनविरोध निवडणूक करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी प्रयत्न केले आहेत. येथील निवडणूक बिनविरोधची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खंडाळा गावातही यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नगर तालुक्यातील बहुतांश गावात भाजप ( माजी आमदार शिवाजी कर्डिले गट ) आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यातच दुरंगी लढत होणार आहे. काही ठिकाणी गावातील जुन्या प्रस्थापितांविरोधात तरूणाई एकत्र आल्याने तेथे तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
...
नेते मंडळींकडून मनधरणी
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रत्येक गावातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. किती अर्ज मागे घेतले जातात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अर्ज मागे घेण्यासाठी नेते मंडळींकडून मनधरणीही करण्यात येत आहे. उद्या लगेच चिन्ह वाटप केले जाणार आहे. मतदान केंद्रांची निश्चित संख्याही उद्याच निश्चित होणार आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले व महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे गावागावातील राजकीय घड़ामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
...
फोटो-०३वारूळवाडी सत्कार
..
ओळी - नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.