कुळधरण : पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण भरल्याने ओव्हरफ्लोचे पाणी भीमा नदीत सोडल्याने नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र अचानक सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गाने विविध भागातील नदीपात्रातील वाळू उपसा करणाऱ्या बोटी, जलपर्णी वाहत येऊन कर्जत तालुक्यातील खेडनजीकच्या पुलाला अडकल्या आहेत.भीमा नदीतील पाणी आटल्याने कर्जत तालुक्यातील भीमाकाठच्या सिद्धटेक, खेड, गणेशवाडी, दुधोडी, भांबोरा, औटेवाडी आदी गावांना पाणी टंचाई जाणवत होती. मात्र सध्या पात्रात सोडलेल्या पाण्याच्या विसर्गाने धोक्यात आलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. खडकवासला धरण भरल्याने ३५ हजार क्युसेकने भीमा पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळी सतत वाढत आहे. सिद्धटेक, खेड, गणेशवाडी भागातील अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप अचानक वाढलेल्या पाण्यात बुडाले आहेत. तसेच पाईप वाहून गेले आहेत.वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात शिरूर, दौंड आदी भागातील अनेक वाळू उपसा करणाऱ्या बोटी वाहून आल्या आहेत. खेड, गणेशवाडी परिसरातील नदीपात्रात जलपर्णीने व्यापले होते. मात्र वेगाच्या प्रवाहाने जलपर्णी वाहत येऊन खेडनजीकच्या पुलाला अडकल्या आहेत. यामध्ये १० ते १२ बोटींचाही समावेश आहे.(वार्ताहर)लिलाव धारकांच्या बोटीखेडजवळच्या भीमा नदीवरील पुलाला अडकलेल्या बोटी राजेगाव (ता.दौंड) येथील लिलाव धारकांच्या आहेत. नदी पात्रात पानवनस्पती व बोटी अडकल्याने प्रवाहाला अडथळे येत आहेत. गावासाठी धोकादायक परिस्थिती नाही. बोटी तसेच पाईप काढण्याचे काम सुरू आहे. नदीकाठच्या अकरा गावांनी सतर्क राहून प्रशासनाला वेळोवेळी माहिती द्यावी.-जयसिंग भैसडे, तहसीलदार
भीमा नदीत पाण्याचा विसर्ग
By admin | Updated: August 2, 2014 01:02 IST