‘मुळा’च्या कालव्यांना आजपासून पाण्याचे आवर्तन
By Admin | Updated: July 27, 2016 00:33 IST2016-07-26T23:52:02+5:302016-07-27T00:33:50+5:30
राहुरी : मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून बुधवारी पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ पाण्याचा गैरवापर होऊ

‘मुळा’च्या कालव्यांना आजपासून पाण्याचे आवर्तन
राहुरी : मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून बुधवारी पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ पाण्याचा गैरवापर होऊ नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे़
प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली़ मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, शेवगावचे तहसीलदार दादासाहेब गिते, नेवासेचे नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते़ जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मुळा धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यानुसार पालवे यांनी बैठक घेवून पाणी सोडण्याचे निर्देश दिले़
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुका प्रशासनाने सुचविलेले पिण्याच्या पाण्याचे उद्भव या आवर्तनातून भरले जाणार आहेत़ कालवा फोडून पाणी घेऊ नये किंवा आवर्तनाला अडथळा येऊ नये म्हणून महसूल विभाग व जलसंपदा विभाग संयुक्त कारवाई करणार आहेत़
मुळा कालव्यालगत असलेल्या गावांसाठी कलम लागू करण्यात आले आहे़ अनधिकृत तलावात पाणी सोडले जाऊ नये, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा सूत्रांनी सांगितले़ मुळा धरणात सायंकाळी १४ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली़ आवक १ हजार १६८ क्युसेकने सुरू आहे़ लाभक्षेत्रावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली़ (तालुका प्रतिनिधी)