विजयपूरकर झाले आक्रमक
By Admin | Updated: June 16, 2014 00:10 IST2014-06-15T23:41:20+5:302014-06-16T00:10:47+5:30
शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.
विजयपूरकर झाले आक्रमक
शेवगाव : पश्चिम महाराष्ट्रातील शेवटचे टोक असलेल्या तालुक्यातील विजयपूर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटून मुक्कामी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचून कैफियत मांडली.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी काही सहकारी अधिकाऱ्यांसह पुर्नवसित विजयपुरला मुक्कामी भेट देऊन गावकऱ्यांशी ग्रामसभेच्या माध्यमातून संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक तक्रारी मांडल्या. तालुक्याचे ठिकाण असलेल्या शेवगावशी संपर्क साधण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली यांत्रिक बोट पूर्ववत सुरु करावी, गावातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, एस.टी. ची बस सेवा, पोलीस पाटील व कोतवालाची नियुक्ती, रानडुकरांचा बंदोबस्त, दारुबंदीची प्रभावी अंमलबजावणी, युवकांसाठी क्रीडा मैदान व क्रीडा संकुल, महिला बचत गटांसाठी कर्ज सुविधा या तक्रारींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता.
जायकवाडी जलाशयाच्या निर्मितीनंतर विजयपूर गावाचा संपर्क पैठण,लोहगाव, आगरनांदूर असा अंदाजे तीस कि.मी. ने वाढला. नित्याच्या कामासाठी शेवगावला जाणे-येणे अडचणीचे ठरत असल्याने आमच्या गावाचा समावेश शेवगाव तालुक्यातच कायमस्वरुपी करावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. दळणवळणाच्यादृष्टीने यांत्रिकी बोट व बोटसेवेच्या मागणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. माजी सरपंच नानासाहेब जगदाळे, काकासाहेब काळे, दत्तात्रय काळे, श्रीमंत जगदाळे, रामदास काळे, अशोक सुरोसे,जनाबाई जगदाळे यांनी विविध प्रश्न मांडले.
(तालुका प्रतिनिधी)
दळणवळणाचा प्रश्न गंभीर
विजयपूर दहिगाव-ने पासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावरील गाव. मात्र जायकवाडी धरणाच्या निर्मितीमुळे या दोन्ही गावांमध्ये जलाशयाच्या पाण्यामुळे अंतराचा अडसर निर्माण झाला. अंतरात तीस कि.मी. ने वाढ झाली. आता पैठणला वळसा घालून लोहगाव आंगरनांदूर मार्गे विजयपूरला जावे लागते. गोदावरी नदीत कायम स्वरुपी पाणी असते. परंतु बोटसेवा नसल्याने दळणवळणात अडचण येते. सात वर्षापूर्वी माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या प्रयत्नातून बोटसेवा सुरु झाली. परंतु बोट नादुरुस्त झाल्याने ही सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे गावाचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे.