वाळूतस्करांनी केले मुलीचे अपहरण, पाच जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:54 IST2018-04-14T18:11:24+5:302018-04-14T19:54:14+5:30
वाळूतस्करांनी मुलीचे अपहरण केल्याची घटना बारागाव नांदूर येथे शुक्रवारी रात्री घडली़ यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूतस्करांनी केले मुलीचे अपहरण, पाच जणांविरुद्ध गुन्हा
बारागाव नांदूर : वाळूतस्करांनी मुलीचे अपहरण केल्याची घटना बारागाव नांदूर येथे शुक्रवारी रात्री घडली़ यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोळावर्षीय युवती आईसोबत घरात झोपली होती. यावेळी वडीलही घरातच होते. वाळूतस्कर किशोर माळी व संजय बर्डे यांच्यासह अन्य तिघे जण शुक्रवारी रात्री बळजबरीने घरात घुसले. त्यांनी वडिलांसमोरच तिला उचलून चारचाकी वाहनातून पळवून नेले. मुलीस पळवून नेले जात असल्याचे लक्षात येताच वडिलांनी आरडाओरड केली. मात्र काही मिनिटातच चारचाकी वाहनातून पाचही आरोपी मुलीस पळवून नेण्यात यशस्वी झाले. याबाबत तिच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार किशोर माळी याच्यावर वाळूतस्करीसंदर्भात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. फौजदार दिलीप राठोड तपास करीत आहेत.
पोलीस आरोपींच्या मागावर
मुलीला पळून नेल्यानंतर राहुरी पोलीस पाच आरोपींचा शोध घेत आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. आम्ही लवकरच संबंधितांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळू, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या वडिलांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.