स्वर्णिम विजय वर्षानिमित्त लष्कराचे विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:25+5:302021-02-05T06:38:25+5:30
अहमदनगर : १९७१ च्या भारत-पाक युद्धातील विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष भारतात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे ...

स्वर्णिम विजय वर्षानिमित्त लष्कराचे विविध कार्यक्रम
अहमदनगर : १९७१ च्या भारत-पाक युद्धातील विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने हे वर्ष भारतात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्त अहमदनगरच्या एसीसी अॅण्ड एस व एमआयआरसी या लष्करी प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दरम्यान, दिल्ली येथून निघालेली मशाल रॅली शुक्रवारी नगरमध्ये दाखल झाली. लष्कराकडून या मशालीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकवर विजय मिळविला व बांगलादेशाची स्थापना झाली. या विजयाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने भारतात ३ डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वर्णिम विजय वर्ष साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील अमर ज्योतीमधून चार मशाली देशाच्या विविध भागात रवाना करण्यात आल्या आहेत. त्यातील दक्षिण भारतात नगरमार्गे जाणारी विजय मशाल २९ जानेवारी रोजी नगरमध्ये दाखल झाली. औरंगाबाद रोडवरून आलेल्या या मशालीचे नगरच्या सैनिकांनी स्वागत केले. डीएसपी चौकातून जिल्हा न्यायालय, एसीसी अॅण्ड एस सेंटर, भूईकोट किल्ला, चांदणी चौक व तेथून पुढे सोलापूर रोडने ही मशाल एमआयआरसीच्या युद्धस्मारकापर्यंत गेली. या मशाल यात्रेत सैनिक पायी, सायकल, तसेच घोड्यावर स्वार होऊन सहभागी झाले होते. १९७१च्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले माजी ब्रिगेडिअर आर. एस. रावत यांच्याकडे एमआयआरसीत मशाल सुपुर्द करण्यात आली. रावत यांच्यासह एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर विजय सिंह राणा यांनी १९७१च्या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
--------------
बांगलादेशी अधिकारीही सहभागी
भारताने बांगलादेशाला हे युद्ध जिंकून दिल्याने मित्रराष्ट्र म्हणून अनेक बांगलादेशी अधिकारी नगरच्या एमआयआरसीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या बांगलादेशी अधिकाऱ्यांनी मशालीसह युद्धस्मारकावर शहिदांना मानवंदना दिली. ही विजय मशाल ४ फेब्रुवारीपर्यंत येथील युद्धस्मारकावर राहणार आहे.
--------------
माजी सैनिकांचा गौरव
दुसऱ्या दिवशी (३० जानेवारी) एमआयआरसीमध्ये १९७१ युद्धातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा गौरव करण्यात आला. एसीसी अॅण्ड एसचे कमांडंट मेजर जनरल एस. झा व एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर विजय सिंह राणा यांच्या हस्ते वीरपत्नी, वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले निवृत्त मेजर जनरल मलिक, ब्रिगेडिअर रावत, ले. कर्नल अनंत गोखले यांनी युद्धातील आठवणींना उजाळा दिला. बांगलादेश लष्कराचे कॅप्टन एहसान यांनी १९७१च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सशस्त्र सेनेने निभावलेली निर्णायक भूूमिका व त्यामुळे दोन्ही राष्ट्रांत सध्या असलेले मैत्रीचे संबंध याचा विशेष उल्लेख केला.
--------------
फोटो - ३०एमआयआरसी १ व २
१९७१ च्या युद्ध विजयाप्रित्यर्थ दिल्लीतून आलेल्या मशाल यात्रेचे नगरमध्ये लष्कराने स्वागत केले. त्यानंतर एमआयआरसीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांकडून वीरपत्नी, वीरमातांचा सन्मान करण्यात आला.