केंद्रात वर्णी लागल्याशिवाय राज्यात मंत्रिपद नको
By Admin | Updated: June 2, 2016 23:09 IST2016-06-02T23:01:22+5:302016-06-02T23:09:29+5:30
संगमनेर : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना व मित्र पक्षांशी आमची युती निवडणुकांपुरती आहे. राज्यात मंत्रिपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

केंद्रात वर्णी लागल्याशिवाय राज्यात मंत्रिपद नको
संगमनेर : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना व मित्र पक्षांशी आमची युती निवडणुकांपुरती आहे. राज्यात मंत्रिपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा निश्चित चांगले मिळेल. मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्री आरपीआयचा असेल. पण, केंद्रात वर्णी लागल्याशिवाय पक्ष राज्यात मंत्रीपद स्विकारणार नाही, अशी सडेतोड भूमिका आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी जाहीर केली.
नाशिकला जाताना शासकीय विश्रामगृहावर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरपीआयचे राज्य सचिव विजय वाक्चौरे, श्रीकांत भालेराव, अशोक गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, चांगदेव जगताप आदी उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, विधानपरिषदेची जागा आम्ही स्वत:हून घेतली नाही. अजून मित्र पक्षांना कुणालाही काही मिळाले नाही. आम्हाला दिलेली आश्वासने आधी पाळा. भाजपा-शिवसेनेत दरी निर्माण होत असल्याने परवा अंधेरीला आम्ही एकत्र आलो. यापुढे भांडणे न करता एकोप्याने राहण्याचा निर्णय झाला आहे. भांडत राहिलो तर २०१९ च्या निवडणूकीत जनता आपल्याला माफ करणार नाही. केवळ दलितच नव्हे तर दलित व सवर्णांना बरोबर घेण्याची आरपीआयची भूमिका आहे. ‘शायनिंग’ मारणाऱ्यांच्या हाती नव्हे तर समाजात लोकप्रिय असलेल्या कार्यकर्त्यांकडे पक्षाचे नेतृत्व दिले पाहीजे. जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. या निवडणुकीत मित्र पक्षांच्या भरवशावर अवलंबून न राहता आरपीआयने उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही सर्वजण एकत्र येवून लढलो तर यश नक्की मिळेल. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे. त्याला आमचा विरोध नाही.रेणके अहवालाप्रमाणे १० टक्के ‘हूमांतू’ समाजाला आरक्षण मिळू शकते. एकूण ५२ टक्के लोकांना २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. राहिलेल्या ५० टक्यांमध्ये १० टक्के धनगरांनाही ते मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेले आरोप हे केवळ बदनामी करण्याच्या हेतूने केले आहेत. ‘दाऊद’चे खडसे यांच्याबरोबर संबंध असतील, असे वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी खडसेंनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे आठवले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा नेहमी आरपीआयच्या पाठीशी उभा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून चांगल्या अपेक्षा आहेत. नगर जिल्ह्याला एखादे महामंडळ मिळेल, असे सूतोवाच खा.रामदास आठवले यांनी करताच आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
शिर्डी लोकसभा निवडणुकीत इथल्या लोकांनी माझी वाट अडविली. माझ्या पराभवाला फक्त बाळासाहेब विखे एकटेच नाहीत, तर इथले काँग्रेसचे दोन्ही नेते जबाबदार आहेत. प्रचार यंत्रणा काँग्रेस नेत्यांकडे होती. विषारी प्रचार झाल्याने आपण हरलो. स्वतंत्र यंत्रणा असती तर चित्र वेगळे दिसले असते. भविष्यात संधी मिळाली तर ‘सोनार बंगला’ प्रमाणे ‘सोनार शिर्डी’ म्हणजेच सोन्याची शिर्डी केल्याशिवाय राहणार नाही.
- खासदार रामदास आठवले, अध्यक्ष आरपीआय