राहुरीतील दोन खंडणीखोर जेरबंद
By Admin | Updated: February 24, 2016 23:43 IST2016-02-24T23:39:04+5:302016-02-24T23:43:27+5:30
अहमदनगर : वाळू व्यावसायिकाला पेपरमधून बदनामी करण्याची धमकी देऊन ८० हजार रुपये उकळणाऱ्या राहुरी येथील दोघांना तोफखाना पोलिसांनी मंगळवारी रात्री नगरमध्ये अटक केली

राहुरीतील दोन खंडणीखोर जेरबंद
अहमदनगर : वाळू व्यावसायिकाला पेपरमधून बदनामी करण्याची धमकी देऊन ८० हजार रुपये उकळणाऱ्या राहुरी येथील दोघांना तोफखाना पोलिसांनी मंगळवारी रात्री नगरमध्ये अटक केली आहे. नानाजी भाऊसाहेब पटेकर आणि सुंदरबापू बंडू बर्डे (रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे आणि पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी ही कारवाई केली.
राहुरी येथील वाळू व्यावसायिक नंदकुमार कचरू गागरे (रा. देसवंडी, ता. राहुरी)यांनाच दोघांनी धमकी दिली होती. ‘चोरीचे काम करीत आहे. जास्तीची वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याबद्दल बदनामी करू,अशी धमकी दिली. वाळू लिलावाबाबत नकारात्मक बातमी न छापण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणीही त्यांनी गागरे यांच्याकडे केली. यावेळी त्यांच्यामध्ये बरेच वाद झाले. पाच लाख रुपयांची रक्कम देणे शक्य नसल्याचे गागरे यांनी सांगितले. त्यानंतर ८० हजार रुपयांवर तडजोड झाली. ही रक्कम देण्याचे मान्य करून दुसरीकडे गागरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तोफखाना पोलिसांनी सापळा लावून पटेकर व बर्डे यास नगरमध्ये मंगळवारी रात्री अटक केली. राहुरी येथील हॉटेल अतिथी येथे १६ फेब्रुवारीला रक्कमेची मागणी करण्यात आली होती. गागरे यांनी नगर येथील हॉटेल श्रद्धा (सावेडी) येथे मंगळवारी पैसे देण्याचे सांगितले होते. तेथेच पोलिसंनी सापळा लावला आणि दोघांना मंगळवारी रात्री पाऊणच्या सुमारास अटक केली. गागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अविनाश मोरे तपास करीत आहेत. पटेकर हा राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका साप्ताहिकाचा पत्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी दोघांनाही २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली, याचा पोलिसांना तपास करावयाचा आहे.
(प्रतिनिधी)