ऐतिहासिक वास्तू सुशोभिकरणासाठी दोन कोटीचा निधी

By Admin | Updated: May 29, 2014 00:28 IST2014-05-28T23:47:29+5:302014-05-29T00:28:37+5:30

अहमदनगर : नगर शहरातील ऐतिहासिक वास्तुंच्या पाऊलखुणांची जोपासना करण्यासाठी खासदार दिलीप गांधी पुढे सरसावले आहेत.

Two crore funds to beautify the historic architectural beauty | ऐतिहासिक वास्तू सुशोभिकरणासाठी दोन कोटीचा निधी

ऐतिहासिक वास्तू सुशोभिकरणासाठी दोन कोटीचा निधी

अहमदनगर : नगर शहरातील ऐतिहासिक वास्तुंच्या पाऊलखुणांची जोपासना करण्यासाठी खासदार दिलीप गांधी पुढे सरसावले आहेत. दमडी मशिद, फर्‍याबाग, बारा इमाम कोठला, चंगेजखान महल या वास्तुंच्या सुशोभिकरणासाठी निधीही उपलब्ध केला आहे. नगर शहराच्या पंचशतकोत्तर स्थापना दिनानिमित्त बुधवारी ‘लोकमत’ने खुणावताहेत पाऊलखुणा या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. निजामशाहीच्या वैभवशाली वारशातून नगरच्या राज्यकर्त्यांना प्रेरणा घेता येईल. वास्तुंचे जतन होण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. या बाबीकडे लक्ष वेधले होते. तसेच भुईकोट किल्ल्याच्या बंद पडलेल्या कामाबाबत गांधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वरील माहिती दिली. भुईकोट किल्ल्याचे काम संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्याने थांबले आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. त्यातून तब्बल ६ ते ७ कोटींची कामे झाली. परंतु दुरूस्ती, देखभालीअभावी तेथे पूर्ववत स्थिती झाली आहे. थेट संरक्षण मंत्री अरूण जेटली यांना भेटून नगरच्या भुईकोटाचे काम सुरू करण्याची विनंती केली आहे. लवकरच या किल्ल्याचे काम सुरू होईल, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. शहरातील पुरातत्त्व खात्याकडील दमडी मशिद, चंगेजखान महलजवळील मकबरा, नियामत खान महल, बारा इमाम कोठला, मक्का मशिद, निजामशहाचा मकबरा, फर्‍याबाग आदी वास्तुंचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणासाठी भारत पेट्रोलियम कंपनीने २ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यास तत्वत: मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या कामांना आता लवकरच गती मिळेल असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Two crore funds to beautify the historic architectural beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.