पदोन्नती होणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण कशासाठी?

By Admin | Updated: June 9, 2014 00:03 IST2014-06-08T23:48:53+5:302014-06-09T00:03:59+5:30

अहमदनगर : तिसरी आणि चौथीच्या वर्गाच्या सुधारित अभ्यासक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

Training for teachers who are promoted? | पदोन्नती होणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण कशासाठी?

पदोन्नती होणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण कशासाठी?

अहमदनगर : तिसरी आणि चौथीच्या वर्गाच्या सुधारित अभ्यासक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या याच शिक्षकांची १५ दिवसात पदोन्नतीने बदली होणार आहे. यामुळे या शिक्षकांना कशासाठी प्रशिक्षण देता, अशी कुजबुज जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरू आहे.
राज्यात सर्वत्र इयत्ता तिसरी आणि चौथीचा सुधारित अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षकांना वर्गात शिकविता यावा, यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्याचे प्रशिक्षण लोणावळा येथे तर जिल्हास्तरावरील प्रशिक्षण कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण या ठिकाणी झालेले आहे.
आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तालुकास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले. त्यानुसार तालुकापातळीवर पहिल्या टप्प्यात तिसरीच्या वर्गाचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. यासाठी ९ ते १४ जून ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. राज्यात सर्व जिल्हा परिषदांनी २० जूनला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जवळजवळ रद्दच केलेल्या आहेत. मात्र, या शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सुमारे ७०० ते ७५० शिक्षकांना पदोन्नती मिळणार आहे. यातील बहुतांशी शिक्षक हे तिसरी आणि चौथीच्या सुधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षण संपल्यानंतर या शिक्षकांची पदोन्नतीने बदली होणार असल्याने या शिक्षकांना तातडीने प्रशिक्षण देण्याची गरज काय ? असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.राज्यातील अन्य जिल्ह्यात ज्या प्रमाणे २० तारखेनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच दरम्यान, जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्व तालुक्यात ९ ते १४ जून या कालावधीत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी हा सकाळी दहा ते सायंकाळी पाच ठेवण्यात आलेला असताना जामखेडचे गटशिक्षणाधिकारी अंकुश जंजीरे यांनी तालुक्यातील प्रशिक्षणाचा कालावधी सकाळी सात ते सायंकाळी सहा ठेवलेला आहे. हा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. प्रशिक्षणात ५० टक्के महिला शिक्षक असल्याने सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा त्या कशा जाणार? यामुळे या ठिकाणी वेळ बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी २० जून नंतर तिसरी आणि चौथीच्या सुधारित अभ्यासक्रमाचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापूर्वी शिक्षकांचे प्रमोशन पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे जे शिक्षक खऱ्याअर्थाने तिसरी आणि चौथीला अध्यापन करणार आहेत, त्यांनाच प्रशिक्षण मिळाले. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रश्नी लक्ष घालावे.
-डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते.

Web Title: Training for teachers who are promoted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.