जिल्ह्यात टोलचे मोल कायम
By Admin | Updated: June 11, 2014 00:16 IST2014-06-10T23:32:35+5:302014-06-11T00:16:42+5:30
अहमदनगर : सरकारने राज्यातील ४४ टोल बंद करण्याचा आदेश दिल्याने राज्यातील वाहनचालक आणि एसटी महामंडळ खुशीत आहेत. मात्र, या निर्णयाचा नगर जिल्ह्याला पुरेसा लाभ होणार नाही.
जिल्ह्यात टोलचे मोल कायम
अहमदनगर : सरकारने राज्यातील ४४ टोल बंद करण्याचा आदेश दिल्याने राज्यातील वाहनचालक आणि एसटी महामंडळ खुशीत आहेत. मात्र, या निर्णयाचा नगर जिल्ह्याला पुरेसा लाभ होणार नाही. बंद केलेले नाके बंदच होते. उर्वरित नाके सुरू राहणार असल्याने वाहनचालकांना टोलसाठी मोल द्यावेच लागेल.
नगरचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी राज्यातील टोलविरोधात मोहीम सुरू केली. २००८ मध्ये त्यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राज्य सरकारला टोल धोरण ठरविण्याबाबत खडसावले होते. तसेच मुदत संपलेले टोलनाके बंद करण्याचा आदेश दिला होता. त्याबाबत सरकारने पूर्वीच निर्णय घेतला होता. मात्र, काल जाहीर केला. राज्य सरकारने छोट्या वाहनचालकांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो जाहीर केला नाही, अशी माहितीही चंगेडे यांनी दिली. जामखेड रस्त्यावरील खर्ड्याचा, नगर-करमाळा रस्त्यावरील मांगी येथील तसेच दौंडजवळील टोलनाका बंद झाला आहे. हे नाके जिल्ह्याच्या हद्दीबाहेरील आहेत. परंतु त्या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना थोडाफार दिलासा मिळेल. (प्रतिनिधी)
सरकारने जाहीर केलेल्या टोलनाक्यामध्ये नगर-जामखेड रस्त्यावरील पांढरी नाक्याचा उल्लेख आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानचा नाकाही बंदचा आदेश दिल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, टोलनाका सुरूच होता. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली, संगमनेरमधील वडगाव पान, रांजणगाव देशमुख आणि नगरमधील टाकळी काझी येथील टोल नाके बंद केल्याचे सरकारने जाहीर केले आहे.