अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युद्धाचा थरार; दोन तास चालला लष्कराचा सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 04:45 IST2018-01-15T14:52:31+5:302018-01-16T04:45:23+5:30
लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला.

अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युद्धाचा थरार; दोन तास चालला लष्कराचा सराव
अहमदनगर : नगर जवळील के. के. रेंज या लष्काराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर सोमवारी (दि. १५) निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला. लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला.
मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही़ व्ही़ सुब्रमन्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्या वतीने नगरजवळील लष्कराच्या के. के. रेज या युद्ध सराव भूमीवर भारताच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रितांसमोर युद्ध प्रात्यक्षिकांचा थरार रंगला.
लष्कराच्या २ तासाच्या प्रात्यक्षिकाने अंगावर शहारे आणणारा युद्ध भूमीचा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रित थक्क झाले. प्रारंभी रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत शत्रूच्या काही क्षणात भस्मसात करणा-या तोफांचा मारा करण्यात आला. कानठळ्या बसविणा-या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरकाप उडाला. लष्करी प्रात्यक्षिकात रणगाडे मुख्य आरक्षण होते.
अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९० या संगणकप्रणालीने युक्त असणा-या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या रणगाड्यांमध्ये गन, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात.
तब्बल दोन तास रणगाड्यांमधून तोफांचा मारा, गोळीबार, हेलीकॉप्टर यांची प्रात्यक्षिके रंगली. या प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.