बत्तीस वर्षानंतर दुष्काळ

By Admin | Updated: July 26, 2014 00:33 IST2014-07-25T23:11:56+5:302014-07-26T00:33:51+5:30

राहुरी : बागायती तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यात १९८२ नंतर पहिल्यांदाच दुष्काळाचा तडाखा बसला आहे़

Thirty seven years of famine | बत्तीस वर्षानंतर दुष्काळ

बत्तीस वर्षानंतर दुष्काळ

राहुरी : बागायती तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यात १९८२ नंतर पहिल्यांदाच दुष्काळाचा तडाखा बसला आहे़ रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसू व सध्या सुरु असलेल्या पुष्य नक्षत्रामध्ये केवळ ६७ मिलीमीटर इतक्या निचांकी पावसाची नोंद झाली़ गेल्या ३२ वर्षामध्ये पहिल्यांदाच तालुक्यात खरीप हंगामात केवळ १३ टक्के पेरण्या झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़
गेल्या वर्षी राहुरी तालुक्यात जुलै महिन्यात २५० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली होती़ १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला़ तालुक्यात सरासरी ४५५ मिलीमीटर पाऊस होतो़ त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर खरीप व रब्बी हंगाम यशस्वी होण्यास मदत होते़
राहुरी तालुक्यात खरीपाचे क्षेत्र २८००० हेक्टर असून, आत्तापर्यंत अवघ्या तीन हजार हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत़ सन १९८२ नंतर तालुक्यात प्रथमच एवढ्या कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत़ तीन दिवस तुरळक स्वरुपात भिज पावसाने हजेरी लावली़ मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ऊन पडत असून, वातावरणातील दमटपणाही वाढला आहे़
पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, दूध उत्पादनामध्ये घट होऊ लागली आहे़ ऐन पावसाळ्यात पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ जिरायती भागातून चरण्यासाठी आलेल्या मेंढ्या अद्याप आपापल्या गावी परतलेल्या नाहीत़ त्यांच्यापुढे चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे़ मुळा-प्रवरा या नद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाला़ त्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे़ मुळा धरणात पाण्याची पुरेशी आवक न झाल्याने ऊस लागवडी ठप्प झाल्या आहेत़ शेती अडचणीत आल्याने बाजारपेठेतही मंदी आहे़ शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे व खते पडून असून अन्य व्यवसायांनाही मंदीचा फटका जाणवत आहे़ खरीप हंगाम गेल्याने शेतकऱ्यांची सारी भिस्त रब्बीवर आहे़ येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास रब्बीला अनुकूल वातावरण राहिल़ ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ मुळा धरण भरण्याची आशा मावळली आहे़
(तालुका प्रतिनिधी)
पेरणीचे क्षेत्र घटले
गेल्या ३२ वर्षात प्रथमच खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे़ कापूस २२०० हेक्टर, मका १५ हेक्टर, चारा २६० हेक्टर, ऊस १३५ हेक्टर, बाजरी ७० हेक्टरवर पेरणी झाली आहे़

Web Title: Thirty seven years of famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.