शेतकऱ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: June 30, 2014 00:35 IST2014-06-29T23:30:17+5:302014-06-30T00:35:05+5:30
शेवगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाईचे अनुदान, पिकविम्याची रक्कम तसेच अन्य कारणांसाठी

शेतकऱ्यांचा ठिय्या
शेवगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाईचे अनुदान, पिकविम्याची रक्कम तसेच अन्य कारणांसाठी जिल्हा सहकारी बँकेच्या तालुक्यातील शेवगावसह विविध शाखांमध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी रविवारी बँकेच्या शेवगाव शाखेतील विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
विविध मागण्या
जिल्हा सहकारी बँकेच्या शेवगावसह तालुक्यातील विविध शाखांमध्ये शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, शासनाकडून वेळोवेळी मिळणारे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊनही ते अदा केले जात नाही, बँकेतील कर्मचारी या कामासाठी शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती देऊन हेलपाटे मारायला लावतात, नवीन खाते उघडण्याच्या कामात दिरंगाई, पासबुक भरून देतानाही टाळाटाळ, शेतकऱ्याचे खाते एका शाखेत असताना पिकविमा, गारपीट अनुदानाचे पैसे अन्य शाखेत जमा होतात तसेच इतर तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.
याबाबत शेवगाव तालुका काँग्रेसच्यावतीने जिल्हा सरचिटणीस डॉ. अमोल फडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका उपाध्यक्ष नारायण टेकाळे, सेक्रेटरी रघुनाथ सातपुते इतर कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी सहकारी बँकेच्या शेवगाव टाऊन शाखेच्या तालुका विकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी बँकेच्या नगर येथील व्यवस्थापकीय संचालकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कार्यकर्त्यांनी त्यांना माहिती दिली.
(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना सहकार्याच्या सूचना
शेवगाव तालुका विकास अधिकारी चेके, डॉ. अमोल फडके यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊन यापुढे कोणत्याही शाखेत शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल व तशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात येतील, असे लेखी आश्वासन तालुका विकास अधिकारी चेके यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बँकेच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमोल फडके यांनी दिला.
शेतकरी आक्रमक
जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे वेळापत्रक कोलमडले आहे. शेवगाव येथील ठिय्या आंदोलनप्रसंगी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. हवामान आधारित पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी मुदत संपत आल्याने शनिवारी पारनेर येथे झालेल्या गोंधळात बँक अधिकारी कक्षाच्या काचा फुटल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातही शेतकरी आक्रमक होत आहेत.