दाळमंडई फौंडेशन लावणार शहरात दोन हजार झाडे
By Admin | Updated: June 16, 2016 23:59 IST2016-06-16T23:56:58+5:302016-06-16T23:59:47+5:30
अहमदनगर : लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर या ग्रीन चळवळीचे जिल्हाभरातून स्वागत झाले.

दाळमंडई फौंडेशन लावणार शहरात दोन हजार झाडे
अहमदनगर : लोकसहभागातून वृक्षसंवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर या ग्रीन चळवळीचे जिल्हाभरातून स्वागत झाले. नगर येथील दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने नगर शहरातील विविध भागात दोन हजार झाडे लावण्याचा व ते संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी जागाही निवडल्या आहेत. ‘ग्रीन अहमदनगर’ चळवळीत आम्हाला सहभागी व्हायचे आहे, असे असंख्य दूरध्वनी आज ‘लोकमत’ कार्यालयात खणखणले.
शहरातील वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे धुळीने व्यापलेले शहर अशी नगर शहराची ओळख बनली आहे. यावर मात करीत नगरला ‘ग्रीन सिटी’चा दर्जा मिळवून देण्यासाठी ‘लोकमत’ने लोकसहभागातून ‘माय सिटी-माय ट्री’ हे अभियान हाती घेतले आहे. याच अभियानांतर्गत नागरिकांना झाडे लावण्याचे व ते जगविण्याचे आवाहन ‘लोकमत’ने गुरुवारी केले. या अभियानाचे शहरासह जिल्ह्यातूनही स्वागत झाले. व्हॉटस् अॅप ग्रुप, फेसबुकवरही या उपक्रमाचे स्वागत झाले.
‘ग्रीन अहमदनगर’साठी दाळमंडई फौंडेशन ट्रस्टने उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला आहे. फौंडेशनचे अध्यक्ष संजय ताथेड, उपाध्यक्ष सुधीर मुनोत, सचिव अनिल अनेचा, प्रकल्प संचालक विनोद बोथरा यांनी ‘लोकमत’शी थेट संपर्क करून ‘ग्रीन अहमदनगर’ अभियानात आम्ही सहभागी होणार असल्याचे सांगितले. या अभियानाद्वारे दोन हजार झाडे लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. तसे लेखी पत्रही त्यांनी ‘लोकमत’ला दिले आहे. पहिल्या टप्प्यात ते सातशे झाडे लावणार आहेत. त्याच्या जागा आणि रोपांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच शहरातील शाळांमध्ये झाडे लावण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. त्यासाठी शाळांनी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी फौंडेशनचे संचालक देवकिसन मणियार, पप्पुशेठ मुंदडा, नितीन चंगेडिया, संतोष पिपाडा, आशिष खंडेलवाल, अमित मुथ्था, सतीश काकाणी, राजू शेटिया, किशोर डागा, प्रशांत मुथ्था, राजेंद्र मुनोत, संजय लुंकड, सूरज कोठारी, बजरंग दरक आदी उपस्थित होते.
या फौंडेशनने यापूर्वी दुष्काळी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या टप्प्यात सातशे झाडे
दाळमंडई फौंडेशनने श्री. रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशन शाळा भवानीनगर येथे ( ५० रोपे), देऊळगाव सिद्धी (२०० रोपे), वडगाव तांदळी (२०० रोपे), नवजीवन कॉलनीतील ओपन स्पेस (७० रोपे), जैन पार्क, पुनममोतीनगर (५० रोपे), नंदनवन कॉलनी, बुरुडगाव रोड( ५० रोपे), कराचीवाला नगर (५० रोपे) अशी एकूण ६७० झाडे पहिल्या टप्प्यात लावण्याची जबाबदारी घेतली आहे. तसा लेखी प्रस्ताव त्यांनी आज ‘लोकमत’कडे सादर केला.
सहभागासाठी संपर्क
ग्रीन अभियानात सहभागी होण्यासाठी लोकमत कार्यालयात ९१७५५७५७५५ या भ्रमणध्वनीवर अथवा ०२४१-२४२९९०२, २४२९७११ या क्रमांकावर संपर्क साधावा. लोकमत कार्यालयात आपण प्रत्यक्ष भेट देऊनही या अभियानात काही जबाबदारी घेऊ शकता.