मंत्र्यांमागे समाजाचं बळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 23:49 IST2016-06-11T23:42:19+5:302016-06-11T23:49:26+5:30
पारनेर : धनगर समाजातील ज्यांच्याकडे मंत्रिपद आहे, ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मर्यादित आहेत़ त्यांच्यामागे समाजाचे बळ नाही,

मंत्र्यांमागे समाजाचं बळ नाही
पारनेर : धनगर समाजातील ज्यांच्याकडे मंत्रिपद आहे, ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मर्यादित आहेत़ त्यांच्यामागे समाजाचे बळ नाही, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
पारनेर तालुक्यातील पळशी येथे शनिवारी रासपच्यावतीने अहिल्यादेवी होळकर जयंती व धनगर समाजाचा मेळावा झाला़ या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा होते. जानकर म्हणाले, मराठा किंवा धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रवादी व काँगे्रसला सोडविता आला असता, परंतु त्यांना दिल्लीवरून आरक्षण पाहिजे की सत्ता, असे पर्याय ठेवल्याने दोन्ही काँगे्रसने फक्त खुर्चीसाठी सत्ता ठेवली व आरक्षणाचा विषय बाजूला केला. अहिल्यादेवींची जयंती आम्ही चौंडीत सुरू केली, आता काहीजण आमच्याविरोधात ‘उद्योग’ करीत आहेत़ रासप आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहे, असे जानकर म्हणाले़
नाहाटा म्हणाले, महादेव जानकर यांना आगामी मंत्रिमंडळात कॅबीनेट मंत्रिपद मिळणार असून त्यामुळेच त्यांना राज्यात काही जणांकडून लक्ष्य केले जात आहे. मेळाव्यास दौंडचे आमदार राहुल कुल, महिलाध्यक्षा श्रद्धाताई भातंबेकर, जिल्हाध्यक्षा सुनीता हिरडे, तालुकाध्यक्ष गंगाराम कोळेकर, सरपंच संतोष जाधव, राधाकृष्ण बाचकर, उपसरपंच सारीका शिंदे, विठ्ठल कारंडे, शिवाजी सुळ, सर्जेराव सुडके उपस्थित होते.
नाहाटा लोकसभेचे उमेदवार
आमदार महादेव जानकर यांनी बाळासाहेब नाहाटा यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगितले. तर कर्जत-जामखेडवर आपले बारीक लक्ष असून कैलास शेवाळे, स्वप्नील देसाई यांना बळ दिले जाईल, असेही ते म्हणाले़
राज्यात आपल्याला कॅबीनेटमंत्रीपद मिळाले नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल या जुन्या बातम्या माझ्या विरोधकांकडुन येत आहेत़ कॅबीनेटपदासाठी मी आमदारकीचा राजीनामा देणार नसून मला कोणते मंत्रीपद व खाते कोणते द्यायचे हा सरकारचा निर्णय असेल, असे जानकर यांनी सांगीतले.