रक्तदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढाकार हवा
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:32:22+5:302014-06-14T01:19:29+5:30
अहमदनगर : रक्तदानासंदर्भात सरकारी, सामाजिक पातळीवरून प्रबोधन प्रचार आणि प्रसार सुरू असताना जिल्ह्यात अद्यापही रक्तदात्यांची टक्केवारी ४५ च्या पुढे गेलेली नाही.
रक्तदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुढाकार हवा
अहमदनगर : रक्तदानासंदर्भात सरकारी, सामाजिक पातळीवरून प्रबोधन प्रचार आणि प्रसार सुरू असताना जिल्ह्यात अद्यापही रक्तदात्यांची टक्केवारी ४५ च्या पुढे गेलेली नाही. भविष्यात रक्ताची वाढलेली गरज आणि आवश्यकता पाहता रक्तदान चळवळ वाढणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा सरकारी रुग्णालयातील रक्तपेढीकडून व्यक्त करण्यात आलेले आहे.
जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून नगर जिल्ह्यातील रक्तदान चळवळ आणि आवश्यक असणाऱ्या रक्ताचा आढावा घेतला. नगर शहरात जिल्हा सरकारी रुग्णालयासह अन्य सहा रक्त पेढ्या आहेत. यात काही खासगी तर काही ट्रस्टच्या माध्यमातून चालविल्या जात आहे. दिवसेंदिवस वाढलेले आजार, अपघातांची मोठी संख्या, थॅलेसेमिया आजाराच्या रुग्णांसाठी रक्ताची मोठी आवश्यकता आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयात वर्षाला तीन हजार ३०० पिशवी रक्त संकलन होते. मात्र, वर्षाकाठी मागणी ही जवळपास ४ हजार पिशव्यांची आहे. जिल्ह्यात रक्तदान करणाऱ्यांची संख्या जवळपास ४५ टक्के आहे. शासन आणि खासगी संस्थांच्यावतीने रक्तदान चळवळ वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येतात. प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून किमान एकदा रक्तदान केल्यास त्याचा फायदा रक्ताची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तीला होणार आहे.
शिबिरातून संकलित करण्यात आलेल्या रक्ताची आधी पाच प्रकारची चाचणी होते. यात एचआयव्ही, गुप्तरोग, कावीळ ब आणि क वर्ग, तसेच मलेरिया यांचा समावेश होतो. या चाचणीतून सापडणारे शुध्द रक्त गरजवंत रुग्णाला देण्यात येते. जिल्हा रुग्णालयातून एका रक्ताच्या पिशवीसाठी ४५० रुपये आकारण्यात येत आहे. अन्य खासगी ठिकाणी वेगवेगळ दर आहेत.
जिल्ह्यासाठी लवकरच सरकारी मेट्रो ब्लड बँक तयार होणार आहे. ती तयार झाल्यावर रक्तातून शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या उपपदार्थाची निर्मिती करता येणार असल्याचे जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात उन्हाळ्यातील एप्रिल आणि मे महिन्यात खऱ्याअर्थाने रक्ताचा तुटवडा असतो. या काळात कॉलेज बंद असतात. यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करता येत नाही. लग्नसराई, वाढलेले अपघात यामुळे रक्ताची अतिरिक्त आवश्यकता असते. यामुळे या काळात जास्तीतजास्त रक्तदान होणे आवश्यक आहे. यासाठी जनकल्याण रक्तपेढी जास्तीतजास्त ऐच्छिक रक्तदात्यांना संपर्क करून अधिकाधिक रक्त संकलन करण्याचा प्रयत्न करते.
- मंगेश साठ्ये, जनकल्याण रक्तपेढी.
कार्ल लॅण्डस्टिनर यांना अभिवादन
जनकल्याण रक्तपेढीने एप्रिल २०१४ पर्यंत सुमारे दोन हजार रक्तदान शिबिरांतून १ लाख ५० हजार पिशव्या रक्ताचे संकलन केलेले आहे. यासाठी १ लाख १५ हजार दात्यांनी रक्तदान केलेले आहे. रक्तदाता दिनाचे औचित्य साधून सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीत दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत ७०० रक्तदात्यांच्या रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.
कार्ल लॅण्डस्टिनर यांनी रक्ताचे गट, आरए फॅक्टर यांचा शोध लावला. त्यांचा जन्म दिवस १४ जून १८६८ ला असल्याने १४ जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यांना या शोधासाठी वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.