तीनशेहून अधिक वर्गांना गुरुजीच नाहीत
By Admin | Updated: July 1, 2017 13:31 IST2017-07-01T13:31:12+5:302017-07-01T13:31:12+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले़ मात्र शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ संपलेला नाही़

तीनशेहून अधिक वर्गांना गुरुजीच नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले़ मात्र शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ संपलेला नाही़ त्यामुळे शिक्षकांचे २९७ पदे रिक्त राहिले असून, तीनशेहून अधिक वर्गांना शिक्षकच नाहीत़ तसेच दुसऱ्या शाळेत बदली होण्याच्या भीतीने अनेकांना तर जिल्हांतर्गत बदल्यांच्या चिंतेने काहींना ग्रासले आहे़ त्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे़ गेल्या १५ जूनला जिल्हा परिषद शाळांची घंटा वाजली़ शाळा सुरू होण्याआधीच बदल्यांची प्रक्रिया पार पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र जून महिना संपूनही शिक्षकांच्या बदल्या व पदोन्नत्यांचा गोंधळ सुरूच आहे़ पुढील जुलैअखेर हा गोंधळ अधिक वाढण्याची चिन्हे आहेत़ जिल्हा परिषद शिक्षकांची १८३ पदे पूर्वीपासून रिक्त आहेत़ त्यात मागील आठवड्यात ११४ शिक्षकांना पदोन्नत्या मिळाल्या़ त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली़ त्याचा भार इतर शिक्षकांवर पडला़ अंतर जिल्हा वापसी बदलीने १०५ शिक्षक मे महिन्यात जिल्हा परिषदेत हजर झाले़ पण, त्यांची अद्याप शाळेवर नियुक्ती झाली नाही़ हजर होऊन दोन महिने उलटून गेले तरी ते जिल्हा परिषदेतच अडकून पडले आहेत़ ते जिल्हा परिषदेत हजेरी लावून घरचा रस्ता धरतात़ शाळेतवर नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी ते जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडे मागणी करत आहेत़ पण, जिल्हांतर्गत बदल्या होऊ द्या, त्यानंतरच तुमची शाळेवर नियुक्ती होईल, असे त्यांना सांगितले जात आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेत येऊन हजेरी लावतो आहे़ तिकडून सुटल्यानंतर लगेच हजर झाले़ उन्हाळ्याच्या सुट्ट्याही गेल्या़ आता शाळा सुरू झाल्या़ अजूनही नियुक्ती नाही़ इतर जिल्ह्यांतील शिक्षक शाळेवरही हजर झाले आहेत़ मात्र या जिल्हा परिषदेनेच अद्याप शिक्षकांना नियुक्त्या दिल्या नाहीत़ त्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाचेही वांधे झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे़
जिल्हांतर्गत बदल्यांना मिळेना मुहूर्त
शाळा सुरू होण्याआधी ३१ मे पूर्वी शिक्षकांच्या बदल्या होत असतात़ यंदा मात्र तसे झाले नाही़ जुलै महिन्यातही बदल्यांचा गोंधळ सुरूच असून, जिल्हांतर्गत बदल्या लांबणीवर पडल्या आहेत़ या बदल्या होणार असल्याने शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत.
वर्ग सांभाळण्याची कसरत
जिल्ह्यातील तीनशेहून अधिक वर्गांवर गुरुजींची नियुक्तीच करण्यात आली नाही़ त्यामुळे एका शिक्षकाला दोन वर्ग सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे़ तसेच काही शिक्षकांना पदोन्नत्या मिळाल्या़ मात्र, तेथे सहशिक्षकाची नियुक्तीच नाही़ त्यामुळे पदोन्नती झालेल्यांना वर्ग सांभाळण्यासह पदोन्नतीचीही जबाबदारी पार पाडावी लागत आहे़
आॅनलाईन बदल्यांचा विद्यार्थ्यांना फटका
आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या आॅनलाईन केल्या जाणार आहेत़ आंतर जिल्हा बदलीने ६२१ शिक्षक येणार असल्याचे समजते़ परंतु, ते अद्याप हजर झालेले नाहीत़ पण, जिल्हांतर्गत बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया चालू महिन्यात सुरू होणार आहे़ या बदल्यांमध्ये चार संवर्गांच्या बदल्या होणार आहेत़ एका प्रवर्गासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागेल़ त्याचा परिणाम शिक्षणावर होणार आहे़
आंतरजिल्हा आपसी बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
आंतरजिल्हा बदल्यांच्या सन २०१५ मध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी चालूवर्षी झाली़ नगर जिल्हा परिषदेने शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचे पत्र इतर जिल्हा परिषदांना दिले़ मात्र त्यावर पदस्थापनेचा उल्लेख नव्हता़ कार्यमुक्त करण्याच्या पत्रावरच शिक्षक आले़ सुरुवातीला आकृतीबंध पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती करू, असे सांगण्यात आले़ त्यानंतर पदोन्नत्या झाल्यानंतर देऊ, असे सांगितले गेले़ पदोन्नत्याही झाल्या़ परंतु, अद्याप शाळेवर नियुक्ती नाही़