दहा तास थबकली वाहतूक

By Admin | Updated: September 24, 2016 00:10 IST2016-09-24T00:08:24+5:302016-09-24T00:10:09+5:30

अहमदनगर : शुक्रवारी भल्या सकाळपासून शहराच्या चारही दिशेने दुचाकी-चारचाकीला भगवे ध्वज बांधून शिवबाचे मावळे नगर शहराकडे धावत होते.

Ten hours of hitch transport | दहा तास थबकली वाहतूक

दहा तास थबकली वाहतूक

अहमदनगर : शुक्रवारी भल्या सकाळपासून शहराच्या चारही दिशेने दुचाकी-चारचाकीला भगवे ध्वज बांधून शिवबाचे मावळे नगर शहराकडे धावत होते. नगरचा मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक करण्याचा त्यांनी मनाशी चंग बांधला होता. मोर्चात लक्षावधी मावळ्यांच्या उपस्थितीने नगरचा क्रांती मोर्चा यशस्वी ठरला. शहरात तब्बल दहा तास बाहेरून येणारी वाहतूक बंद होती. तर मोर्चानंतर गर्दीमुळे झालेल्या गर्दीमुळे शहर तीन तास ठप्प होते. जुन्या शहरातील प्रत्येक भाग, गल्लीत हातात भगवा घेतलेले मावळे दिसत होते.
शुक्रवारी सकाळी सातपासून क्रांती मोर्चासाठी मावळे नगरमध्ये दाखल होत होते. पोलिसांनी सकाळी ७.३० ला पत्रकार चौक, पोलीस अधीक्षक चौक, भिंगारकडून आणि सोलापूर रोडकडून येणारा रस्ता बंद केला. येथून शहरात दुचाकीला देखील येवू दिले नाही. मात्र, शहरात मध्य भागात राहणारे हौशी मावळे दुचाकी, चार चाकीला भगवे झेंडे लावून मोर्चाच्या मार्गावर फिरत होते. मोर्चा सुरु होण्यापूर्वी शहरातील लालटाकी, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, यासह नालेगाव, अमरधाम रोड या भागात मोर्चासाठी तरूणांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. मोर्चाची वेळ जसजशी जवळ येत होती. तसे तरूण पिढीच्या उत्साहात कमालीची वाढ होतांना दिसत होते.
विशेष करून शालेय विद्यार्थिनी, महाविद्यालय तरूणी आणि महिलांचा मोर्चात मोठा सहभाग होता. मोर्चा संपल्यानंतर शहराच्या चारही दिशांनी मोर्चासाठी शहरात दाखल झालेले मावळे परतीच्या प्रवासाला निघाले होते.
तीनही एसटी स्टॅण्ड रिकामे
क्रांती मोर्चामुळे नगरच्या एसटी महामंडळाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदा माळीवाडा, तारकपूर आणि पुणे एसटी स्टॅण्ड बंद होते. औरंगाबाद पुणे रस्त्यावरून मोर्चा जाणार असल्याने शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी शहरातील सर्व बाह्यवळण रस्त्यांनी एसटी महामंडळ आणि वाहनांची वाहतूक वळवण्यात आली होती. यामुळे दिवसभर एसटी स्टॅण्ड रिकामे होते. एरवी गजबजलेल्या माळीवाडा एसटी स्टॅण्डवर शुकशुकाट दिसला.
मोर्चामुळे शहरातील विविध भागातील स्वच्छता करण्यात आली होती. विशेष करून माळीवाडा वेस, जिल्हा परिषदेचा आवार, बस स्थानकाचा परिसर चकाचक होता. मनपाने अशी स्वच्छता कायम ठेवावी अश्ांी मागणी शहरातील मोर्चेकऱ्यांसोबत सामान्य नागरिकांनी व्यक्त केली. मोर्चाच्या निमित्ताने अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र आले. यातून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. मोर्चाप्रमाणे अन्य विधायक कामात अशी एकी निर्माण व्हावी, अशी अपेक्षा नगरकरांनी या निमित्ताने व्यक्त केली.
उच्चांकी गर्दी
अहमदनगर : इम्पिरीयल चौकातील गर्दी सकाळी ११ नंतर उच्चांकी वाढत गेली. मोर्चात सुरूवातीला महिला होत्या. साधारण पाऊण तासाने महिलांची रांग संपली आणि वकिलांची रांग सुरू झाली. मात्र, त्यानंतर मोर्चात पुन्हा महिलांची रांग सुरू झाली. ही रांग दुपारी १ पर्यंत सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी गर्दी थांबण्यास तयार नसल्याने आंदोलनकर्त्यांना बुरूडगाव रोड आणि माळीवाडा वेशीकडे वळवण्याची वेळ आली.
शुक्रवारी नगरमध्ये झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने गर्दीचा उच्चांक मोडला आहे. इम्पिरीयल चौकात ज्यावेळी मोर्चेकऱ्यांची तोबा गर्दी होती. त्यावेळी गर्दीची ही रांग रेल्वेच्या पुलापर्यंत होती. साधारण दोन किलोमीटर हे अंतर असल्याने आलेल्या प्रत्येक मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचणे शक्य नव्हते. यामुळे आलेले आंदोलनकर्ते शिस्तीत बुरूडगाव रोड अथवा माळीवाडा वेशी मार्गे मागे फिरत होते.
दुपारी १ नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोर्चेकरी परत येत असल्याचे पाहून नंतर सर्व मोर्चेकरी माळीवाडा मार्गे मागे फिरले. ११ ते १ याकाळात झालेल्या उच्चांकी गर्दी आणि तरूणांच्या हातातील भगव्या ध्वजामुळे जणू शहर आणि मोर्चा मार्ग भगवामय झाल्याचा भास होत होता. शुक्रवारी सरकारी कार्यालयाला सुट्टी नसल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवरून तर राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या छतावरून मोर्चा पाहत उच्चांकी गर्दी पाहून तोंडात बोट घातले.
मोर्चा दरम्यान गर्दी होवू नये, यासाठी गटागटाने मोर्चेकरी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पाठवण्यात येत होते. काही शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांच्या गणवेशात मोर्चात सहभाग नोंदवला. तर काही लहान मुलांनी आणि तरूणांनी शिवाजी महाराजांची वेषभूषा साकारली होती. अपंग व्यक्तीही आपल्या हातात भगवा घेवून मोर्चात सहभागी झाले.
४माळीवाडा बसस्थानक परिसरात कोपर्डी दुर्घटनेतील पीडित मुलीला मदत करण्यासाठी मदत पेटी ठेवण्यात आली होती. माळीवाडा एसटी बसस्थानकाच्या समोर पुणे-औरंगाबाद रोडवर ही पेटी ठेवण्यात आली होती. मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी यात आर्थिक मदत टाकत, सामाजिक जबाबदारी पार पडली. याचा उपयोग कोपर्डी पीडित कुटुंबाला होणार आहे.
संगमनेरातून लाख मराठे
संगमनेर : अहमदनगर येथे काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चासाठी संगमनेर तालुक्यातून एक लाखापेक्षाही अधिक मराठा बांधवांनी हजेरी लावली. सुमारे ७ हजार वाहनामधून शुक्रवारी भल्या पहाटेच नागरिकांनी मोर्चासाठी संगमनेरहून नगरकडे प्रयाण केले. दुचाकीपासून लक्झरी गाड्यांपर्यंत हजारो वाहने नगररोडवरुन भल्या सकाळीच धावली. या रस्त्यावर वाहनांची एवढी मोठी झालेली गर्दी पाहण्यासाठी अनेकांनी रस्त्याच्या कडेला गर्दी केली होती. संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरु होती. मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी वाहनांचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटेपासूनच वेगवेगळया वाहनांमधून मराठा बांधवांनी नगरकडे प्रयाण करण्यास सुरुवात केली. स्वयंसेवकांनी सर्वांची व्यवस्था केली. अनेक लक्झरी बसेस, वेगवेगळी चार चाकी वाहने, अनेक दुचाकी मधून नागरिक जाताना दिसत होते. शहरातील जाणता राजा मैदान परिसरात व इतर ठिकाणी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
नेवाशात सामाजिक एकीचे दर्शन
नेवासा : अहमदनगर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने घोडेगाव येथे शिंगणापूर चौफुल्यावर मोर्चासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने चहा, बिस्कीट व चिवड्याचे वाटप करण्यात आले. दलित युवक, माळी समाज, वंजारी समाज व मुस्लीम तसेच धनगर व अन्य समाजाच्या लोकांनी मोर्चासाठी जाणाऱ्या युवकांना चिवडा वाटप केले. यात मोठे सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.
शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने घोडेगावात सकाळी ७ वाजल्यापासून मोठी गर्दी झाली होती. अहमदनगर येथे मोर्चासाठी जाणाऱ्या युवकांची सकाळी ७ वाजल्यापासून घोडेगावात गर्दी झाली होती. भगवे झेंडे, काळ्या निषेधाच्या पट्ट्या लावून तरुण-तरुणी मोठ्या संख्येने घोडेगावात जमा झाले होते.
नेवासा तालुक्यात सुमारे ८०० गाड्याची व्यवस्था फक्त महिलांसाठीच केली होती. त्यात महिला बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. सोनई परिसरातील काहींनी स्वखर्चाने महिलांसाठी गाड्या दिल्या होत्या. गर्दीमुळे अनेकदा औरंगाबाद रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली.
जमशिद सय्यद, अजिमभाई, सरदारभाई, रमेश बोर्डे, दादासाहेब वैरागर, बाळासाहेब बनकर,
तुकाराम मिसाळ, पांडुरंग अनारसे, कारभारी डफाळ, चांगदेव दहिफळे, उदय पालवे, वैभव नहार,
कैलास कुंभकर्ण, सुभाष राख, संदिप कुऱ्हाडे, अशोकदेवा कुलकर्णी यासह अन्य समाज बांधवांच्या
हस्ते चिवड्याचे वाटप करण्यात आले.
नेवासा तालुक्यातून सुमारे १ लाख लोक नगरच्या मराठा क्रांती मोर्चासाठी गेले असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. माजी आमदार शंकरराव गडाख, विठ्ठलराव लंघे यांच्यासह नेवासा तालुक्यातील अन्य पदाधिकारी घोडेगाव येथून मोटार सायकल रॅलीत सहभागी होऊन नगरला गेले होते.
(तालुका प्रतिनिधी)
किल्ला मैदान हाऊसफूल्ल
अहमदनगर : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याने शुक्रवारी पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षण अनुभवला़ शेवगाव-पाथर्डी रोडने येणाऱ्या लाखो मोर्चेकऱ्यांमुळे किल्ला मैदान हाऊसफुल्ल झाले होते़
हातात भगवे झेंडे घेऊन चांदणी चौकाच्या दिशेने कूच केलेल्या जनसागरात युवक, युवतींसह अबालवृद्ध सहभागी झाले होते़ शेवगाव रोडवरील बाराबाभळी येथील मदरसा परिसरातही वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़ दुपारी एक पर्यंत शेवगाव-पाथर्डी तालुक्यांतून मोठ्या संख्येने मोर्चेकरी येत असल्याने भिंगार परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती़
दीडच्या सुमारास मोर्चा संपला तरीही मोर्चात सहभागी होण्यासाठी वाहने दाखल होत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त वाहने पार्किंगला दाखल झाली होती़
सकाळी साडेनऊच्या सुमारास भिंगार शहर व आसपासच्या गावातील सुमारे सहा हजार नागरिकांनी पायी दिंडीने नगर कडे प्रस्थान केले़ यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता़
राहुरीतून दीड लाख लोकांची हजेरी
राहुरी : अहमदनगर येथे संपन्न झालेल्या महाक्रांती मूक मोर्चामध्ये राहुरी तालुक्यातून दीड लाख लोक सहभागी झाले होते़ शेकडो चारचाकी व हजारो दुचाकींवर नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते़ राहुरी येथे विविध समाजाच्यावतीने मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांना चहा-नाष्ट्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती़ शिस्तबध्दरित्या वाहनांनी नगरच्या दिशेने आगेकूच केली़ जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणांनी मार्ग दणाणून गेला़ रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती़
मोर्चेकऱ्यांना रिक्षातून मोफत प्रवास
अहमदनगर : पहाटे पाच वाजेपासून मोर्चेकरी दाखल होत होते़ नगर शहरात मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता़ त्यामुळे मोर्चेकऱ्यांची पायपीट होवू नये, या उद्देशाने आॅटो रिक्षाचालक पोपट कराळे यांनी सावेडी ते पत्रकार चौक अशा फेऱ्या मारून विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिली़ महिला, मुले व नागरिकांनी कराळे यांना धन्यवाद दिले़ समाज बांधवांप्रती त्यांची आत्मीयता दिसून आली़ अशाच प्रकारे अनेकांनी यथाशक्ती मोर्चेकऱ्यांची सेवा केली़
औरंगाबाद रोड लाइव्ह
अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या लाखो जनांच्या जनसागरात सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत औरंगाबाद रोड हरवून गेला होता़ सकाळी ६ वाजता सुरू झालेला गर्दीचा ओघ दुपारी १ पर्यंत सुरूच होता़ या रस्त्यावरील हॉटेल इंद्रायणी ते चांदणी चौक असे सात ते आठ किलोमीटरचे अंतर पार करत मोर्चेकरी दाखल होत होते़
४दुपारी १ वाजेच्या सुमारास चांदणी चौकातील मुख्य व्यासपीठावर निवेदन वाचन सुरू झाल्यानंतरही गर्दीचा ओघ सुरूच होता़ ध्वनीक्षेपकाचा आवाज कानावर पडल्यानंतर रस्त्याने चालणारे मोर्चेकरी आहे त्याच ठिकाणी थांबले़ पाठीमागून मात्र, गर्दी वाढतच असल्याने चांदणी चौक ते डीएसपी चौकापर्यंत रस्त्यावर तुडुंब गर्दी झाली होती़
४औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी हॉटेलजवळ शेतात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती़ चांदणी चौकातील निवेदन वाचन संपल्यानंतर मोर्चेकरी पुन्हा पाठीमागे वळले़ पाठीमागून मात्र, मोर्चेकरी येत होते़ अनेकांना डीएसपी चौकातूनच पाठीमागे फिरावे लागले़ मात्र, या मोर्चाचा आम्ही एक भाग झालो हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते़
४अनवाणी पायाने दाखल मोर्चात शिर्डी येथील राजेंद्र गोंदकर हे अनवाणी पायानेच दाखल झाले होते़ एका पायाने अपंग असल्याने त्यांना चप्पल घालणे शक्य नव्हते़ मात्र, मोर्चात यायचे असा त्यांचा निर्धार होता़ इंद्रायणी हॉटेल ते चांदणी चौक असे अंतर पार पायी करत ते या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झाले होते़
४पाण्यासह अन्नपदार्थांचेही वाटप मोर्चात सहभागी झालेल्यांना औरंगाबाद रोडवर सहा ठिकाणी पाणी, बिस्किटांचे वाटप करण्यात आले़ कोठला चौकात मुस्लीम बांधवांच्यावतीने पाणी आणि पुरीभाजीचे वाटप केले़
पुणे रोड लाइव्ह
४केडगाव, चास तसेच पारनेर तालुक्यातील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थी शालेय गणवेशात मोर्चात सहभागी झाले होते़ काहींनी मोठ्या हौसेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आपल्या मुलांना मोर्चात दाखल केले होते़
४रेल्वे स्टेशनकडे जाणारे सगळे मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने रेल्वेने जाणारे व रेल्वेतून उतरणारे प्रवाशी यांचे रिक्षाअभावी मोठे हाल झाले.मोठ-मोठे सामान घेऊन त्यांना कैक कि.मी.पर्यंत पायपीट करावी लागली. केडगाव व स्टेशन भागात सर्व रिक्षा बंद असल्याने त्यांना गैरसोय सहन करावी लागली.
४केडगाव मधील शेकडो स्वयंसेवकांनी शुक्रवारी पहाटेच्या सहा वाजल्यापासून आपल्या दिलेल्या ठिकाणी उभे होते़ पार्किंग व वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वच पॉइंटवर स्वयंसेवकांनी मोठे कष्ट घेतले़ केडगाव बायपास,केडगाव वेस,रंगोलीचौक,केडगाव देवीमंदिर, रेल्वे उड्डाणपूल या ठिकाणी स्वयंसेवक तैनात होते.
४मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या पुणे व दौंड मार्गावरील मोर्चेकरी मोर्चापर्यंत पोहचू शकले नाहीत. मोर्चाची गर्दी थेट कायनेटिक चौकापर्यंत जाम झाली होती.ही गर्दी बाहेर पडण्यासाठी चार तास लागले.

Web Title: Ten hours of hitch transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.