शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:38+5:302021-04-22T04:21:38+5:30
अहमदनगर : गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. गुढीपाडवा, रामनवमी ...

शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार रखडले
अहमदनगर : गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. गुढीपाडवा, रामनवमी झाली. आता रमजानचा पवित्र महिनाही सुरू झालेला आहे. महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिलं नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
मार्च पेड इन एप्रिल पगार न होण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी सांगितल्या जात आहेत. मात्र या सर्वांचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. कोविड काळात अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेकजण कोविडग्रस्त असून उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. कर्जाचे हप्ते थकलेत. दंड, व्याज भरावे लागत आहे. या सगळ्या परिस्थितीत शिक्षण विभाग मूक गिळून बसलेला आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण विभागातल्या या दिरंगाईवर आणि शिक्षण विभागातले अधिकारी काम करत नाहीत, याबद्दल आवाज उठवला. तेव्हा काम करायचं राहिलं बाजूला पण शिक्षण सचिवांनी विधान परिषदेच्या सभापतींकडेच आमदार कपिल पाटील शिक्षकांच्या हिताच्या निर्णयांसाठी दबाब टाकतात, अशी तक्रार केली आहे. अशा प्रकारची वागणूक करणाऱ्या शिक्षण सचिवांनाच हटवा, अशी मागणी शिक्षक भारतीने आज केली आहे. वेतन दिरंगाई अहमदनगर जिल्ह्यात देखील आहे. १६० शाळांचे फेब्रुवारीचे पगार अद्याप झालेले नाहीत. ते व्हावेत, अशी मागणी संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, सरचिटणीस महेश पाडेकर, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु आदींनी केली आहे.