राहुरी : ऊस उत्पादक शेतक-यांची एफआरपी देणे असताना २२०० सभासदांनी सह्या दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला तनपुरे कारखाना यंदा ५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. एफआरपी थकीत असताना सुरू होणारा तनपुरे साखर कारखाना राज्यातील पहिलाच कारखाना असणार आहे, अशी माहिती डॉ़ सुजय विखे यांनी दिली.बारागाव नांदूर येथे आयोजित उस उत्पादक शेतकरी मेळाव्यात डॉ़ विखे बोलत होते़ अध्यक्षस्थानी भानुदास कोहकडे हे होते. ३०० कोटी रूपयांच्या कर्जाचा बोजा असताना तीन वर्ष कारखाना बंद होता. कामगारांनी आठ महिन्याचे रिपेअरींगचे काम अवघ्या तीन महिन्यात केले. धुराडे पेटविण्याचे काम मी केले. आता ऊस देण्याचे काम सभासदांचे आहे. यावर्षी उस दिला नाही तर पुन्हा कारखाना सुरू करता येणार नाही, असे सुजय विखे म्हणाले. यावेळी साहेबराव गाडे, पंढरीनाथ पवार, शिवाजी सागर यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास ज्येष्ठ संचालक शिवाजीराव गाडे, अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, प्रभाकर गाडे, विजय डौले, सत्यवान पवार, नारायण जाधव, उत्तमराव म्हसे, वसंतराव गाडे आदी उपस्थित होते.
एफआरपी थकीत असतानाही सुरु होणार राहुरीतील तनपुरे कारखाना - सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:40 IST