दोन महिलांची मुलासह रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:58 IST2019-04-02T13:56:23+5:302019-04-02T13:58:05+5:30
राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात अजनी-पुणे या रेल्वेखाली दोन महिला व एक लहान मुलगा यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.

दोन महिलांची मुलासह रेल्वेखाली आत्महत्या
वांबोरी : राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात अजनी-पुणे या रेल्वेखाली दोन महिला व एक लहान मुलगा यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अजनी-पुणे एक्सप्रेस रेल्वे राहुरीवरून अहमदनगरच्या दिशेने जात असताना खडांबे शिवारात आल्यानंतर वर्षा अंबादास ठुबे (वय ४३), मुलगा अनुप बिरजाशंकर तिवारी (वय ९, सर्व राहणार केडगाव, जि.अहमदनगर) व एक अनोळखी महिला (वय ५०) या तिघांनी एकत्रित आत्महत्या केली.
याप्रकरणी अजनी-पुणे एक्सप्रेस चालकांनी तात्काळ वांबोरी रेल्वे स्टेशनला दोन महिला व एक मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ अहमदनगर रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक देवीचंद बाविस्कर,पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लांडगे, अरुण पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आहे. मृतदेह अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले.
छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहांची ओळख पटविणे मुश्किल झाले होते. त्यामुळे पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर वर्षा ठुबे व अनुप तिवारी यांचे मृतदेह वर्षा ठुबे हिचा भाऊ किरण यांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास अहमदनगर रेल्वे पोलीस करीत आहेत. या घटनेची रेल्वे पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.