कर्जाऐवजी साखरेला अनुदान देणे गरजेचे
By Admin | Updated: December 24, 2015 23:35 IST2015-12-24T23:33:30+5:302015-12-24T23:35:18+5:30
संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे.

कर्जाऐवजी साखरेला अनुदान देणे गरजेचे
संगमनेर : साखर कारखानदारी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणीत सापडली आहे. ३ हजार ५०० रुपये उसाला भाव मिळाल्याशिवाय एफआरपीप्रमाणे भाव देणे शक्य नाही. त्यामुळे कारखान्यांना बिनव्याजी कर्जाऐवजी साखरेला अनुदान देण्याची मागणी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.
रविवारी खराडी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँक अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अॅड. माधव कानवडे, शिवाजी थोरात, रणजीत देशमुख, शंकर खेमनर, रावसाहेब नवले आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, सहकार हा गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे. निकोप सहकारामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे. खराडी हे विकासाच्या पाठिशी उभे राहणारे गाव आहे. निवडून आल्यावर गळ्यात पडणारे हार हे जनतेच्या अपेक्षांचे असतात. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगून सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुमताने विजयी केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. गायकर यांनी थोरातांमुळे जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत यापुढे दूध व्यवसायाला बँक मदत करणार असल्याचे स्पष्ट केले. खेमनर, तांबे, देशमुख, कानवडे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक वाघ यांनी केले. कार्यक्रमास भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, मीनाक्षी थोरात, पूनम माळी, रोहिणी गुंजाळ, अण्णा राहिंज, अॅड. नानासाहेब गुंजाळ, रावसाहेब वर्पे, अॅड. मधुकर गुंजाळ, गणपत सांगळे, अशोक खेमनर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी करून नाना वाघ यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)