कोपरगाव : शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या बैलबाजार रस्ताचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेने ते तत्काळ पूर्ण करावे. अन्यथा १ मे ला नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना बुधवारी (दि. ७) दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कुरेशी म्हणाले, या रस्त्याचा प्रामुख्याने निवारा, खडकी, सुभद्रानगर, ओमनगर, गवारेनगर, शंकरनगर व इतर उपनगरातील नागरिक वापर करतात. हा त्यांच्यासाठी सोयीचा मार्ग आहे. या रस्त्याचे काम जवळपास एक वर्षापासून बंद पडलेले आहे. काम सुरू करावे यासाठी नगरपालिकेला १७ डिसेंबरला निवेदन दिले होते. त्यानंतर वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. संबंधित ठेकेदारालाही काम सुरू करण्यासंदर्भात वारंवार सूचना केली. परंतु, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. या रखडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मोठमोठ्या कपारी आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच स्पीडब्रेकर नसल्याने सतत अपघात घडत आहेत.