अपंगांची जबाबदारी समाजाने घ्यावी
By Admin | Updated: September 19, 2016 00:11 IST2016-09-19T00:08:32+5:302016-09-19T00:11:22+5:30
संगमनेर : अपंगत्त्वाला बऱ्याचदा समाजव्यवस्थाही जबाबदार असते. विविध प्रकारच्या अपघातांमुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे

अपंगांची जबाबदारी समाजाने घ्यावी
संगमनेर : अपंगत्त्वाला बऱ्याचदा समाजव्यवस्थाही जबाबदार असते. विविध प्रकारच्या अपघातांमुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपंगांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही समाजानेच घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले़ ‘लोकमत’ने यासाठी घेतलेला पुढाकार हा प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
‘लोकमत’, साधू वासवानी ट्रस्ट व लायन्स क्लब संगमनेर सफायरतर्फे येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये रविवारी अपंगांना मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) बसविण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीष मालपाणी, सचिव मिलिंद पल्लोड, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, साधू वासवानी मिशनचे समन्वयक मिलिंद जाधव, डॉ़ सलील जैन, डॉ़सुशांत राऊत, डॉ़ राहुल सरोज, जितेंद्र राठोड, ज्ञानेश्वर पाटील, सुशिल ढगे आदी उपस्थित होते़
‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व़ जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले. दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधला तर समाजहिताचे मोठे काम उभे राहते. राज्यात आघाडीचा माध्यमसमूह असलेल्या ‘लोकमत’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. हे शिबिर अपंगांच्या जीवनाला उभारी देणारे आहे. समाजात अनेक अपंग व्यक्ती आपणातील कमतरतांवर मात करुन यशस्वी होतात. त्यांच्या पाठिशी समाजाने उभे रहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. संगमनेर लायन्स क्लब तसेच साधू वासवानी मिशनच्या कार्याचे यावेळी त्यांनी कौतूक केले. प्रारंभी लंके यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील अपंग व्यक्ती शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिबिरात कृत्रिम हाय-पाय बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात आले. संगमनेर येथेच दीड महिन्यानंतर प्रत्यक्षात अवयव बसविले जाणार आहेत. सूत्रसंचालन प्रा. संदिप सातपुते यांनी केले. विलास गुंजाळ यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
‘लोकमत’ हे जिल्ह्यासह महाराष्ट्रात घराघरात वाचले जाणारे वृत्तपत्र आहे़ प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रम या वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचतात़ लोकमत,साधू वासवानी मिशन आणि लायन्स क्लब संगमनेर सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले जयपूर फूट शिबिर अपंग बांधवांसाठी लाभदायी ठरणार आहे़ ‘लोकमत’च्या सहभागामुळे राज्यभरात शिबिराविषयी माहिती झाली़ त्यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ अपंगत्व नशिबी आलेल्यांना समाजाच्या आधाराची गरज आहे़ हा आधार देण्याचे काम लायन्स क्लब गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे़
-गिरीष मालपाणी,
संस्थापक अध्यक्ष, लायन्स क्लब, संगमनेर सफायर.