सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्य घडते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:12+5:302021-07-11T04:16:12+5:30
कोपरगाव : जोपर्यंत माणसावर आध्यात्मिक संस्कार होत नाहीत, तोपर्यंत त्याला समाजाची ओढ लागत नाही. आणि समाजाची ओढ लागली की ...

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजकार्य घडते
कोपरगाव : जोपर्यंत माणसावर आध्यात्मिक संस्कार होत नाहीत, तोपर्यंत त्याला समाजाची ओढ लागत नाही. आणि समाजाची ओढ लागली की त्याच्या हातून विधायक काम घडून जाते. समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, मागे न राहता पुढे चालत राहिले तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या हातून समाजकार्य आपोआप घडते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी येथे व्यक्त केले.
कोपरगाव येथील के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वृक्षवेध फाउंडेशन यांच्या वतीने दत्तक गाव अंजनापूर (ता. कोपरगाव) येथे आयोजित वृक्षारोपण व कृतज्ञता कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. याप्रसंगी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव, स्नेहालय परिवार अहमदनगरचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, प्रा. एन. जी. बारे, वृक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे, सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. शैलेंद्र बनसोडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. एस. एम. देवरे, डॉ. सुरेखा भिंगारदिवे आयोजक म्हणून उपस्थित होते.
अशोकराव रोहमारे म्हणाले, अंजनापूर हे गाव पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळेच हे गाव आमच्या महाविद्यालयाने दत्तक घेतले आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक या गावात सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे काम करीत आहे. यावेळी संजय सातव, गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. रुबी कन्स्ट्रक्शनचे संचालक संदीप गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
............
फोटो१०- अंजनापूर, कोपरगाव