शालेय जगतातही सोशल मीडियाचे वर्चस्व
By Admin | Updated: June 9, 2014 00:02 IST2014-06-08T23:59:23+5:302014-06-09T00:02:52+5:30
अहमदनगर : शाळेची पहिली घंटा वाजण्यास आठवडाभराचा अवकाश असला तरी आतापासूनच पालक व विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली आहे़

शालेय जगतातही सोशल मीडियाचे वर्चस्व
अहमदनगर : शाळेची पहिली घंटा वाजण्यास आठवडाभराचा अवकाश असला तरी आतापासूनच पालक व विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली आहे़ शालेयसाहित्याच्या किमतीत सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. छोटा भीम, व्हॉट्स अॅप, फेसबुक, जगातील ७ आश्चर्य, नवीन दुचाकींच्या चित्रांनी शालेय साहित्याचे जग व्यापले आहे. यंदा तिसरी व चौथीची पुस्तके नव्या स्वरुपात आणि मोठ्या आकारात आली आहेत़
या वर्षी राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा १६ जूनला उघडत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना नवे वर्ष, नवे पुस्तके, नव्या वह्या, नवे दप्तर, नवा गणवेश यांचे मोठे आकर्षण असते. यामुळेच शहरातील शालेय साहित्याची विक्री करणारी दुकाने आतापासूनच गर्दीने फुलून गेली आहेत. शालेय साहित्यांच्या किमतीत दरवाढ झाल्याने पालकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. वह्या पुस्तकांपासून कंपास पेटी, दप्तर, गणवेश, शाळेचा बूट इथपासून ते जेवणाचा डबा आणि पाण्याची बॉटल या सर्व साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
रेडिमेड गणवेशाचे फॅड
शाळेत प्रसिद्ध असलेली खाकी विजार, पांढरा शर्ट आता कालबाह्य झाल्याने शहरातील शाळांप्रमाणे आता ग्रामीण भागातील शाळांनीही गणवेशाचा ड्रेस कोड केला आहे़ यामुळे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांचे गणवेश रेडिमेड स्वरुपात बाजारात उपलब्ध आहेत. शाळांच्या नावांचे फलकच कापड दुकानांसमोर लावण्यात आले आहेत. बालवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गणवेश उपलब्ध आहेत. या गणवेशांच्या किमतीही १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. हे गणवेश ३५० पासून ते २००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत़ काही शाळांनी वेगळेपण जपण्यासाठी गणवेशावर टाय जाकेट, मुलींसाठी लेगींस, हेअर बेल्ट असा साज चढावला आहे.
कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे कारण देत वह्यांच्या किमतीतही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १०० पाणी वही ११ रुपयापासून ते २८ रुपयापर्यंत विकली जात आहे. २०० पाणी वही १३ रुपयापासून ते ३५ रुपयापर्यंत विकली जात आहे. छोटा भीमचे आकर्षक चित्र असलेल्या वह्यांना पसंती आहे.
(प्रतिनिधी)
सचिनची क्रेझ टिकून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या वह्या लोकसभा निवडणुकीनंतर बाजारातून दिसेनाशा झाल्या आहेत. मात्र सचिन तेंडूलकरची क्रेझ अजूनही वह्यांच्या मुख्य पानावर टिकून आहे.
प्लास्टिक कंपासला मागणी
पत्र्याच्या कंपास पेट्या आता कालबाह्य झाल्याने नव्या आकर्षक व अनेक कप्पे असलेल्या कंपास पेट्या विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरल्या आहेत. या पेट्या ४० रुपयांपासून ते ३५० रुपयापर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. मुलींचा कल मात्र कंपास पेटी ऐवजी पाऊचकडेच आहे. कंपासच्या तुलनेत हे पाऊच स्वस्त आहेत.
सोशल मीडियाचा प्रभाव
पाठीवर लटकवलेले आडवे दप्तर आता कालबाह्य होऊन उभ्या सॅक खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. शालेय दप्तरांच्या किंमती ६५ रुपयांपासून ते १२०० रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. या किमतीही १० टक्क्याने वाढल्या आहेत. छोटा भीम,व्हॉट्स अॅप, फेसबुक यांचे लोगो या दप्तरावर अवतरले आहेत. याच दप्तरांना मुलांची मागणी आहे.
गाईडने वाढविले भाव
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सोबती असलेल्या गाईडच्या किमतीही १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पूर्वी सर्व विषयाचे एकच गाईड होते. आता प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र गाईड बाजारात आल्याने पालकांच्या खिशाला नाहक झळ पोहोचली आहे.