आभाळ कोसळले!
By Admin | Updated: June 12, 2014 00:09 IST2014-06-11T23:39:35+5:302014-06-12T00:09:09+5:30
अवकाळीचा तडाखा : सव्वातीन हजार घरे पडली, ३५ जनावरे दगावली

आभाळ कोसळले!
अहमदनगर : मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात तब्बल सव्वा तीन हजार कुटुंबांवर ‘आभाळ कोसळले’आहे. या पावसाने ८ जणांचा बळी घेतला असून, ३५ जनावरे दगावली आहेत. एवढे नुकसान होऊनही अद्यापि सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.
जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. ७ जून अखेर ३ हजार १५२ घरे व गोठ्यांची अंशत: पडझड झाली असून, तब्बल ८६ घरे जमीनदोस्त झाली आहेत. १७ जनावरे लहान आहेत तर १८ मोठ्या जनावरांचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)
पाच जणांनाच मदत
शशिकांत रमेश ढगे (जवळे कडलग, संगमनेर), आदिनाथ गणपत गाडेकर (मळेगाव ने, शेवगाव), राजेंद्र सुखदेव खताळ (रूईछत्तीसी, नगर), ठकूबाई विठोबा हारदे (तुळापूर, राहुरी), अण्णा बाळू दातीर (खंडाळा, नगर), बबई लहानू उगले (थिटेसांगवी, श्रीगोंदा), शांताबाई सदाशिव गिते (निंबळक, नगर), बबन गाडे (बोल्हेगाव, नगर). यातील पाच जणांनाच दीड लाख रूपयांची मदत मिळाली आहे. उगले आणि गिते यांचे शवविच्छेदन न केल्याने त्यांना मदत दिली नाही.
-राजेंद्र पाटील,
निवासी उपजिल्हाधिकारी.