श्रीरामपूर एसटी आगारातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:24 IST2021-09-06T04:24:58+5:302021-09-06T04:24:58+5:30
श्रीरामपूर : येथील एसटी महामंडळाच्या आगारातून पुणे व नाशिककरिता जादा बसेस सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. आगार व्यवस्थापकांना यासंदर्भात ...

श्रीरामपूर एसटी आगारातून
श्रीरामपूर : येथील एसटी महामंडळाच्या आगारातून पुणे व नाशिककरिता जादा बसेस सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. आगार व्यवस्थापकांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
श्रीरामपूर - पुणे मार्गावर दुपारी एक, दोन, सायंकाळी पावणे सात व रात्री आठ वाजता, तर नाशिककरिता सव्वा तीन व सायंकाळी पावणे सात वाजता बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे. नगर, पुणे, शिरूर, सिन्नर व नाशिक ही शहरे औद्योगिक वसाहतीची केंद्र आहेत. श्रीरामपूर येथून शेकडो विद्यार्थी व कामगार दररोज प्रवास करतात. मात्र, आगाराच्या चुकीच्या नियोजनामुळे काही बसेस बंद झाल्या आहेत. त्यातच डिझेलचा पुरेसा साठा नसल्यामुळे बसेस वेळेवर धावत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, आगारातून यावल, रावेर व भुसावळ या जळगाव जिल्ह्याकरिता तीन बसेसच्या फेऱ्या घेतल्या जात आहेत. इंदोर येथेही नव्याने बस सुरू करण्यात आली आहे. या बसेसच्या फेऱ्या कमी करून आगारातील एकूण ४५ बसेसचे योग्यरितीने नव्याने नियोजन करावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
आठ दिवसांमध्ये मागणीप्रमाणे बसेसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अन्यथा कार्यालयावर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उपनगराध्यक्ष अशोक बागुल, दिगंबर सोनवणे, चरण त्रिभुवन, प्रकाश खैरे, सुभाष तोरणे, बंटी गुरुवाडा, लक्ष्मण म्हस्के, चंद्रकांत खरात, कैलास लोखंडे, आर. आर. लोखंडे आदींच्या सह्या आहेत.
-------