शिर्डी मतदारसंघातून लढणार नाही : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:49 IST2018-09-11T18:45:29+5:302018-09-11T18:49:43+5:30
आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईतून लढविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

शिर्डी मतदारसंघातून लढणार नाही : रामदास आठवले
अहमदनगर: आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईतून लढविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा चेहरा आणखी व्यापक करण्यासाठी आणि निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत नॉन दलित (दलितेतर) प्रतिनिधांना उमेदवारी देणार आहे. या निवडणुकीत सेना-भाजपाची युती झाली नाही तर लोकसभेच्या चार तर विधानसभेच्या २५ जागा पक्ष मागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या विषयांवरून विरोध टीका करत असले तरी हे दोन्ही निर्णय देशहिताचेच आहेत. सरकारविरोधात दोन दिवसांपूर्वी देशात पुकारलेल्या भारतबंदला प्रतिसाद मिळाला नाही. केलेली कामे आणि आणि चांगल्या निर्णयाच्या जोरावर केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. अॅट्रोसिटी कायद्यात कुठलाही बदल होणार नाही. हा कायदा दलितांच्या रक्षणासाठी असून सवर्णांना त्रास देण्यासाठी नाही. याचा गैरवापर होत असेल तर मंत्री म्हणून यात लक्ष्य घालणार आहे. दलितांवरील अत्याचारांच्या घटनेबाबत कुणी राजकारण करू नये. आरक्षणाची मर्यादा ७५ टक्यांपर्यंत केली तर मराठा समाजासह रजपूत, जाठ, ठाकूर, धनगर या समाजाला आरक्षण देणे शक्य होणार आहे. फडणवीस सरकार मराठा समाजाच्या बाजुने उभा आहे, असे सांगत आठवले यांनी दलित शब्दाच्या वापरास मनाई करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आम्ही नक्षलवाद्यांपेक्षा खतरनाक
आम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही खतरनाक आहोत. पण पोलीसांनी आम्हाला कधी अटक केली नाही. कारण आम्ही जनहित आणि देशहितासाठी काम करतोत. काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या विचारवंतांविरोधात ते नक्शलवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे असल्याचे पोलीस सांगत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. नक्शलवादी विचारसरणी असणा-यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नये, असे आठवले म्हणाले.
पोलीसांनी भिडेंच्या विरोधात पुरावे शोधावेत
भीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून कडक कारवाई करावी. भिंडेंचे वक्तव्य जरी तपासले तरी पुरावे मिळतील़ असे आठवले म्हणाले.