प्रभावीपणे काम केल्याने शिंदे यांना संधी
By Admin | Updated: July 8, 2016 23:34 IST2016-07-08T23:26:26+5:302016-07-08T23:34:22+5:30
अहमदनगर : गेल्या दोन वर्षात राज्यमंत्री म्हणून राम शिंदे यांनी प्रभावीपणे काम केले़ या कामाची पावती म्हणून शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली

प्रभावीपणे काम केल्याने शिंदे यांना संधी
अहमदनगर : गेल्या दोन वर्षात राज्यमंत्री म्हणून राम शिंदे यांनी प्रभावीपणे काम केले़ या कामाची पावती म्हणून शिंदे यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली असून, नगर जिल्ह्याला न्याय मिळेल आणि शहरासह जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत युतीच्या नेत्यांनी शिंदे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे़
(प्रतिनिधी)
गेल्या दोन वर्षांत राम शिंदे यांनी जे काम केले़ त्याचीच ही पावती आहे़ दोन वर्षांत राज्यमंत्रिपदी त्यांनी चांगली कामे केली़ त्यांची निवड झाल्यामुळे नगर जिल्ह्याला निश्चितच न्याय मिळेल़
-प्रा़ शशिकांत गाडे,
दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना
भाजप पक्षाला राम शिंदे यांच्या रुपाने पहिल्यांदा कॅंिबनेट पद मिळत आहे. पक्षाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्याच्या दृष्टीनेही आनंदाची बाब आहे. मिळालेल्या पदाचा जिल्ह्याच्या सर्व बाजूने विकासासाठी फायदा होणार आहे. पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.
-अभय आगरकर,
शहरजिल्हाध्यक्ष, भाजपा
अहमदनगर जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याचा आनंद आहे. खाते कोणतेही असो जिल्हा विस्ताराने मोठा असल्याने मंत्रिपदाची गरज होती. राम शिंदे यांच्या पदामुळे जिल्ह्याला फायदा होईल, असा विश्वास वाटतो.
-दिलीप गांधी,
खासदार
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे दिलेल्या खात्यांच्या माध्यमातून शिंदे यांनी प्रभावीपणे काम केले़ तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले़ एकूणच त्यांनी केलेल्या कामाची ही पावती असून, त्यामुळे त्यांनाही बढती मिळाली आहे़
-भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष भाजपा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला असून, त्यांच्या या निर्णयामुळे नगर जिल्ह्याला न्याय मिळेल़ त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना कृषी व सहकार खातेच मिळावे, अशी अपेक्षा आहे़ कारण आघाडी सरकारच्या काळात ही पदे नगर जिल्ह्याकडे होती़ तीच संधी शिंदे यांनाही मिळावी़ -शिवाजीराव कर्डिले,
आमदार, भाजपा
प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद देऊन भाजपने सामान्य कार्यकर्ते व जनतेचा सन्मान केला आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचार सांगणाऱ्यांनी आजवर बहुजन समाजाकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले. भाजपने मात्र या समाजाला संधी दिली आहे.
- अशोक कानडे, प्रदेश सरचिटणीस, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा.