शेलार यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
By Admin | Updated: June 23, 2014 00:09 IST2014-06-22T23:37:32+5:302014-06-23T00:09:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस: विधानसभा लढविण्याचे संकेत
शेलार यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पडझड होण्याची चिन्हे आहेत़ पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले़ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगून शेलार यांनी विधानसभेचे रणशिंग यावेळी फुंकले़
स्वाभिमानाची हाक देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली़ स्वाभिमानाची हाक दिल्याने शिवसेना व भारतीय जनता पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबुत दाखल झाले़ परंतु भाजपाच्या नेत्यांच्या पदरी उपेक्षाच आली़ त्यांना कोणतीही पदे मिळाली नाहीत़ प्रामाणिकपणे काम करूनही पक्षात अन्याय झाल्याचे सांगून शेलार यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच हल्ला चढविला़ या पक्षाची कार्यपध्दतीच वेगळी आहे़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना महत्व दिले जाते़ कुकडीचे पाणी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वळसे पाटील यांच्याशी दोन हात करावे लागले़ वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली़ मात्र दखल घेतली गेली नाही़ साकळाई प्रकल्प व विधानपरिषद, या दोन्ही ठिकाणी उपेक्षा पदरी आली असून, पक्षात अन्याय झाल्याने राजीनामा देत आहे, असे शेलार म्हणाले़
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष केला़ कुकडीच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलो़ हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन वरिष्ठांनी दिले होते़ मात्र अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही़ श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत़ याबाबत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते अत्यंत बेफिकिरीने वागतात़ लोकसभा निवडणुकीत गांधी यांना मताधिक्य देऊन श्रीगोंद्यातील मतदारांनी पाचपुते यांच्यावरील नाराजी व्यक्त केली आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र दिसेल, असेही शेलार म्हणाले़ पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय, असे पत्रकारांनी विचारले असता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणार असल्याचे ते म्हणाले़ मात्र कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार, ते योग्य वेळ आल्यानंतर जाहीर करू, अजून बऱ्याच घडामोडी घडतील, असे सांगून इतर पक्षाच्या प्रवेशाबाबत बोलण्याचे टाळले़
(प्रतिनिधी)