श्रीरामपुरात पोलीस कर्मचाऱ्यावरील लाचलुचपतच्या कारवाईची गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST2021-08-24T04:25:38+5:302021-08-24T04:25:38+5:30

हवालदार संजय रघुनाथ काळे याला शहर पोलीस ठाण्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले ...

Serious note of bribery action against a police officer in Shrirampur | श्रीरामपुरात पोलीस कर्मचाऱ्यावरील लाचलुचपतच्या कारवाईची गंभीर दखल

श्रीरामपुरात पोलीस कर्मचाऱ्यावरील लाचलुचपतच्या कारवाईची गंभीर दखल

हवालदार संजय रघुनाथ काळे याला शहर पोलीस ठाण्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. तक्रारदाराच्या नातवावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी काळे याने लाचेची मागणी केली होती. शहरात पोलीस कर्मचाऱ्यांचे पथ संचलन सुरू असताना ११ ऑगस्टला हा प्रकार घडला होता. घटनेनंतर हवालदार काळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काळे याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना घटनेनंतर जिल्हा पोलीसप्रमुखांना लेखी पत्र देण्याची वेळ आली आहे. हवालदार काळे याने ज्या गुन्ह्यासंबंधी लाचेची मागणी केली होती, त्यासंबंधीचा सविस्तर तपशील या पत्रात द्यावा लागला आहे. गुन्ह्याची सद्य:स्थिती तसेच न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख त्यावर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी संगमनेर येथे डिसेंबर २०२० मध्ये पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख यांना एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले होते. या घटनेनंतर तेथील तत्कालीन पोलीस निरीक्षकांना नगर येथे मुख्यालयात बोलाविण्यात आले होते.

अकोले येथे तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या कार्यकाळात दोन पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले होते. पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी निरीक्षक परमार यांची नगर येथे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली होती. एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यावर लाचलुचपतची कारवाई झाल्यास तेथील पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरण्याची भूमिका वरिष्ठांनी घेतल्याचे संगमनेर व अकोले येथील घटनांमधून दिसून आले. त्याचाच भाग म्हणून निरीक्षक सानप यांना लेखी म्हणणे सादर करावे लागले आहे.

---------

वर्षभरात पोलीस ठाण्यामध्ये ४०० गुन्हे दाखल होतात. सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले जाते. मात्र एखादा पोलीस कर्मचारी खोटेनाटे बोलून गैरप्रकार करत असेल तर जबाबदारी कोणाची?

- संजय सानप, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर

Web Title: Serious note of bribery action against a police officer in Shrirampur