शाळा सुरू, मात्र एसटी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:10+5:302021-02-05T06:38:10+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाऊनमध्ये एसटी बस बंद झाल्या. त्या अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागात प्रवाशांचे ...

शाळा सुरू, मात्र एसटी बंद
अहमदनगर : कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाऊनमध्ये एसटी बस बंद झाल्या. त्या अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून नववी ते बारावी व आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागात बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे एसटी महामंडळास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने, तोट्याच्या भीतीने ते पूर्ण क्षमतेने बस सुरू करण्यास धजावत नाहीत.
लाॅकडाऊनच्या काळात मार्च ते जून असे साधारण चार महिने एसटी बससेवा पूर्णपणे बंद होती, परंतु त्यानंतर हळूहळू बस सुरू करण्यात आल्या. सध्या तालुक्याच्या ठिकाणी, तसेच मोठ्या, बाजारपेठेच्या गावांपर्यंत बससेवा सुरू आहे, परंतु पूर्वीप्रमाणे खेड्यापाड्यात बस अद्यापही सुरू नाहीत. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावी व गेल्या आठवड्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये पाच ते सहा महिने विद्यार्थी ॲानलाइन अभ्यास करत होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाइलसह इतर साधने नसल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. विशेषत: दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष लक्षात घेता, त्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊनच अध्ययन करावे लागत आहे, परंतु बहुतांश ठिकाणी बस सुरू नसल्याने, विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत. नाइलाजास्तव काही विद्यार्थ्यांनी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारला आहे.
नगर विभागात अकरा आगार असून, त्यातून सध्या ४७० बस धावत आहेत. लाॅकडाऊनपूर्वी जिल्हाभर ६५२ बस धावत होत्या. म्हणजे अजूनही १८२ बस बंद असून, त्या ग्रामीण भागातील आहेत. विद्यार्थ्यांकडून मागणी आल्यानंतर बस सुरू केल्या जातील, असे महामंडळाचे म्हणणे असले, तरी अजूनही अनेक मार्गांवर तोट्यात बस धावत असल्याने महामंडळाने पूर्वीप्रमाणे बससेवा अद्यापही सुरू केलेली नाही. ती कधीपर्यंत सुरू होईल, हेही अद्याप निश्चित नाही.
------------
नगर विभागातील आगार - ११
एकूण बस - ७००
सध्या सुरू - (प्रवाशी- ४७०, बेस्टसाठी ६०, मालवाहू- ८८)
लाॅकडाऊनपूर्वी सुरू - ६५२
--------------
जिल्ह्यात सध्या ८० टक्के एसटी वाहतूक सुरू आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांनी एसटीची मागणी केली, तर त्या मार्गावर बस सुरू केली जाईल.
- दादाजी महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी, अहमदनगर