मुंबईच्या सराफांना नगरमध्ये लुटले
By Admin | Updated: May 25, 2016 23:46 IST2016-05-25T23:40:38+5:302016-05-25T23:46:23+5:30
अहमदनगर : मुंबई येथील सराफांच्या डोळ््यात मिरचीची पूड टाकून चार जणांनी सराफांकडील ३१ लाख रुपयांचे दागिने (११२५ ग्रॅम) लुटले आहेत.

मुंबईच्या सराफांना नगरमध्ये लुटले
अहमदनगर : मुंबई येथील सराफांच्या डोळ््यात मिरचीची पूड टाकून चार जणांनी सराफांकडील ३१ लाख रुपयांचे दागिने (११२५ ग्रॅम) लुटले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री बुरुडगाव रोड परिसरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुरुडगाव रोड परिसरात असलेल्या आठ ते दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील सराफ व्यापारी जगदीश मोहन पुरोहित (रा. परिमल प्लाझा, कळंबा रोड, मुंबई) हे त्यांचे सहकारी केतन धिरज जैन यांच्यासह १ हजार १२५ ग्रॅम वजनाचे विविध दागिने काळ््या पिशवीमध्ये घेऊन नगरमध्ये मार्केटिंग करण्यासाठी आले होते. ते बुरुडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये उतरले होते. सोन्याचे दागिने घेऊन त्यांनी मंगळवारी दिवसभर नगरच्या सराफा बाजारात मार्केटिंग केले.
सायंकाळी रिक्षाने ते एस.टी. स्टॅण्डपर्यंत पोहोचले. तेथून ते हॉटेलकडे रस्त्याने पायी जात असताना अचानक समोरून आलेल्या चौघांनी त्यांच्या डोळ््यात मिरचीची पूड टाकली आणि त्यांच्या अंगावर धावून आले. यावेळी केतन यांनी पुरोहित यांना सावरण्याचा प्रयत्न करीत असताना अज्ञातांनी केतन यांचा चष्मा काढून त्यांच्याही डोळ््यात मिरची पूड टाकली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याशी झटापट करून त्यांच्याकडील पिशवी बळजबरीने हिसकावली. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे एका कार( एम.एच. १६, झेड-९८७५) मधून पसार झाले होते.
या प्रकरणी जगदीश पुरोहित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर करीत आहेत. ही घटना समजल्यानंतर कोतवाली पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून चोरट्यांची शोधाशोध केली. काही संशयित ठिकाणी छापे टाकले. मात्र पोलिसांना काहीही आढळून आले नाही. सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पथकाने शहरात गस्त घातली.
(प्रतिनिधी)
मुंबईमधील दोघे सराफ व्यापारी मंगळवारी दिवसभर दागिन्यांचे मार्केटिंग करण्यासाठी रिक्षाने व पायी फिरले. लाखो रुपयांचे दागिने घेऊन पायी फिरण्याचा त्यांनी धोका पत्करला, हे चुकीचेच आहे. या चोरीबाबत पोलिसांना काही माहिती मिळाली असून संशयास्पद हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. चोरटे लवकरच हाती लागतील, असा विश्वास आहे.
-सोमनाथ मालकर,
पोलीस निरीक्षक