साईनगरी गर्दीने फुलली
By Admin | Updated: December 24, 2015 23:36 IST2015-12-24T23:29:43+5:302015-12-24T23:36:11+5:30
शिर्डी : नववर्षाची सुरूवात सार्इंच्या साक्षीने आनंददायी व्हावी, यासाठी संस्थान, महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़

साईनगरी गर्दीने फुलली
शिर्डी : नाताळच्या सुट्ट्या व वर्षारंभाचे औचित्य साधून शिर्डीत मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुखकर दर्शन व्हावे व भाविकांची नववर्षाची सुरूवात सार्इंच्या साक्षीने आनंददायी व्हावी, यासाठी संस्थान, महसूल, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे़
नववर्षाला होणारी संभाव्य उच्चांकी गर्दी लक्षात घेवून ३१ डिसेंबरला साई समाधी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा तसेच रात्री साईभजन संध्येचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे़ याशिवाय नाताळ व नववर्षाच्या काळात गर्दीनुसार व्हीआयपी पासेस सुरू ठेवायचे की बंद ? याबाबत परिस्थिती बघून निर्णय घेणार असल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितले़ गर्दी व्यवस्थापनासाठी २५, २६ व २७ डिसेंबर तसेच ३०, ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या काळात दर्शनबारी व्यतिरिक्त प्रवेशासाठी क्रमांक तीनचे व बाहेर पडण्यासाठी चार व पाच क्रमांकाच्या महाद्वाराचा वापर करणार आहे़ कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या पदयात्रींच्या पालख्या वॉटर पार्क, गोरडीया हॉटेल समोरुन पिंपळवाडी रोडवर आणण्यात येणार आहेत़ ३१ जानेवारी रोजी रात्री दहा ते एक वाजे दरम्यान मंदिर परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी दर्शनानंतर रांग मंदिर परिसराच्या बाहेर काढण्यात येणार आहे़ आवश्यकतेनुसार लक्ष्मीमाता मंदिर ते नगर-मनमाड रोडपर्यंतचा पिंपळवाडी रोड व नगर-मनमाड ते संस्थान प्रसादालय हा शिवाचा रस्ता नो व्हेईकल झोन करणार आहे़ हे सर्व निर्णय व बदल गर्दीची परिस्थिती पाहून घेणार असल्याचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी स्पष्ट केले़
नगर-मनमाड महामार्गावरील जड वाहतूक बाहेरून वळवण्यात आली आहे़ गुरुवारी पहाटेपासूनच लांबच लांब दर्शन रांगा लागल्या़ पश्चिमेकडील रांगा जुन्या प्रसादालयातून सुरू झाल्या तर पूर्वेकडील रांगा लक्ष्मी माता मंदिराच्या पुढे गेल्या होत्या़ मंदिर परिसरातही भाविकांची मोठी गर्दी होती़ गुरुवारी दुपारी व्हीआयपी पासेस तीननंतर काही काळ सुरू करण्यात आले होते़ दिल्ली येथील साईभक्त रजनी डंग यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची सजावट केली आहे़ भाविकांच्या सोयीसाठी नाशिक,शिंगणापूर,पुणे,मुंबई आदी ठिकाणी जादा बसेस सोडल्या आहेत़