परतीच्या पावसाने बंधारे-तलाव ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:47 IST2016-10-04T00:23:08+5:302016-10-04T00:47:09+5:30
अहमदनगर : परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दुष्काळी नगर तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे नगर तालुक्यातील बहुतेक ठिकाणचे बंधारे

परतीच्या पावसाने बंधारे-तलाव ओव्हरफ्लो
अहमदनगर : परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दुष्काळी नगर तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे नगर तालुक्यातील बहुतेक ठिकाणचे बंधारे, तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. जलयुक्त शिवाराला या पावसाने दिलासा दिला आहे. गुंडेगावमध्ये पावसाने तांडव केल्याने सारे गाव जलमय झाले आहे. अनेक नद्या व ओढ्यांना पूर आल्याने विहिरीची पातळी झपाट्याने वाढली असून या पावसामुळे सारा नगर तालुका सुखावला आहे.
गेल्या दोन दिवसापासून नगर तालुक्याला पावसाने जोर धरला आहे. चिचोंडीपाटील येथील केळ तलाव पूर्ण भरला असून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. भातोडी, मांडवे येथे जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मेहकरी नदी तब्बल सात वर्षानंतर पहिल्यांदा वाहती झाली आहे. यामुळे या भागात समाधान व्यक्त होत आहे. जेऊर परिसरात जोरदार पावसाने उच्छाद मांडला, तर इमामपूरमधील व आसपासच्या गावातील बंधारे तुडूंब भरल्याने ओसंडून वाहत आहेत. तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा भागात बंधारे भरले असून धबधबे खळखळून वाहते झाले आहेत. पिंपळगाव माळवी, कापुरवाडी या मोठ्या तलावात पावसाची आवक सुरु झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. नारायण डोहो, दरेवाडी, मेहकरी, जांब, कौडगाव, आठवड या भागात जोरदार पावसाने दुष्काळी शाप धुऊन टाकला.
चास, कामरगाव, भोयरे पठार परिसरात हस्ताच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. अनेक गावांची पाण्यासाठी होणारी भटकंती या पावसाने बंद केल्याने पाण्यापासून वंचित असणाऱ्या अनेक गावांना या पावसाने सुखद दिलासा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वाळकी, मठपिंप्री, हातवळण, रुई या गावांना जोरदार पावसाने झोडपले आहे.
(तालुका प्रतिनिधी)
सुमारे साडे तीन वर्षापूर्वी लोकसहभागातून केलेल्या ४७ लाख रुपयांच्या १५ कि.मी.नदी खोलीकरण व रुंदीकरण तसेच लाखो वृक्ष लागवडीने या गावाने टँकरला दोन वर्षापासून बाय-बाय केला तसेच सततच्या दुष्काळावर कायमची मात केली. परतीच्या पावसाने गावातील १६ बंधारे ओव्हरफ्लो झाले असून सारे गाव जलमय झाले आहे. गावतील तलाव भरल्याने शेजारील देऊळगाव,राळेगणम्हसोबा या गावांना ओव्हरफ्लो पाण्याचा लाभ मिळाला आहे. पावसाने गावातील साडे चार हजार क्षेत्र ओलिताखाली येणार असून सर्व क्षेत्र आता बागायती होणार असल्याने गुंडेगाव दुष्काळमुक्त झाले आहे, असे जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सांगितले.
खडकी, खंडाला, बाबुर्डी बेंद या परिसरात आजच्या पावसाने शेतात पाणी साचले. सारोळा कासार, अकोळनेर, भोरवादी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने टँकरसाठी धावाधाव करण्यापासून तूर्त या गावांची सुटका झाली आहे. सारोळा कासार येथे सुमारे ५० लाख रुपये खर्च करून जलयुक्तचे काम करण्यात आले पण पावसाने हुलकावणी दिल्याने येथे मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. ती दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसाने संपवली.