सोयाबीन बियाणांचा तुटवडा कमी करा
By Admin | Updated: May 25, 2014 00:31 IST2014-05-24T23:55:47+5:302014-05-25T00:31:45+5:30
खरीप हंगाम : राधाकृष्ण विखे यांचे अधिकार्यांना निर्देश
सोयाबीन बियाणांचा तुटवडा कमी करा
बाभळेश्वर : शेतकर्यांना खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणांची उपलब्धता करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्या सहकार्याने आणि खासगी कंपन्यांकडून शेतकर्यांकडून बीजप्रक्रिया केलेले बियाणे उपलब्ध करून सोयाबीन बियाणांचा तुटवडा कमी करण्यासाठी कृषी अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़ अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ बैठकीनंतर मंत्री विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल भंडारी, उपायुक्त रवींद्र ठाकरे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ रवीप्रकाश दाणी, आत्माचे संचालक एम़ व्ही़ देशमुख, विभागीय कृषी संचालक अशोक लोखंडे यांच्यासही कृषी विभागातील अधिकारी आणि बियाणे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते़ यावेळी मंत्री विखे म्हणाले की, खरीप हंगामातील इतर पिकांच्या लागवडीबरोबरच सोयाबीनचे पीक घेण्यासाठी शेतकर्यांचा कल दिसून येतो़ सोयाबीनच्या बियाणांसाठी शेतकर्यांची असलेली मागणी आणि बियाणांचा असलेला तुटवडा लक्षात घेऊन, जिल्हा आणि तालुकास्तरावर सोयाबीन बियाणांची उपलब्धता करण्यासाठी कृषी विभागाणे नियोजन केले आहे़ जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व कृषी अधिकार्यांना गावा-गावात जावून शेतकरी आणि शेतकरी गटाशी चर्चा करून नियोजन करून सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बियाणांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात मागणी प्रमाणे खतांची उपलब्धता करून देण्यात येईल़ बियाणे आणि खत विक्रेत्यांना उपलब्ध असलेला साठा, झालेली विक्री याबाबतची आकडेवारी दर्शनीभागात फलकावर लावण्याबाबत सूचना मंत्री विखे यांनी केल्या़महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून ३५ हजार क्विंटल, खासगी कंपनीकडून एक लाख क्विंटल व शेतकर्यांकडून बीज प्रक्रिया करून ५० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असले तरी आणखीही उपलब्धता करावी लागणार आहे़