उपग्रहाद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन
By Admin | Updated: May 25, 2014 00:34 IST2014-05-25T00:02:24+5:302014-05-25T00:34:34+5:30
अहमदनगर: शहरातील जवळपास एक लाख मालमत्ताधारकांची नोंदच महापालिकेत नाही. त्यामुळे त्यापासून मिळणारा कर बुडला जात आहे.

उपग्रहाद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन
अहमदनगर: शहरातील जवळपास एक लाख मालमत्ताधारकांची नोंदच महापालिकेत नाही. त्यामुळे त्यापासून मिळणारा कर बुडला जात आहे. शहरातील मालमत्तांचे उपग्रहाद्वारे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक केली आहे, आयुक्त विजय कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मालमत्ता कर वाढीचा विषय चर्चेला आला. त्याला उत्तर देताना आयुक्त कुलकर्णी बोलत होते. शहरात ८० हजार मालमत्ता असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. उपनगरात अपार्टमेंट तसेच खासगी बंगले उभे राहिले. काही जुन्या तर काही नव्या मालमत्तांची नोंदच महापालिकेकडे नाही. त्यामुळे त्यापासून मिळणारा कर बुडला जातो. शहरातील सर्व मालमत्तांचे उपग्रहाद्वारे पुनर्मुल्यांकन केले जाणार आहे. याशिवाय महापालिकेचा कर्मचारी उपग्रहाद्वारे केलेल्या पुनर्मुल्यांकनाची पडताळणी करणार आहेत. त्यामुळे शहरात नेमक्या मालमत्ता किती याचा आकडा समजेल. त्यानंतर मालमत्ता कर किती आकारायचा याचा निर्णय पदाधिकारी-अधिकारी एकत्र बसून ठरविणार असल्याचे ते म्हणाले. पुनर्मुल्यांकन करण्याचा ठेका खासगी संस्थेला दिला आहे. सहा महिन्यात ही संस्था पुनर्मुल्यांकनाचा अहवाल देणार आहे. पुनर्मुल्यांकनासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात ३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी) नवीन मालमत्तांची नोंद करण्यासाठी नगररचना व वसुली विभाग एकत्रित काम करणार आहे. नवीन बांधकामाला परवानगी देण्याचे काम नगररचना विभागाचे आहे. त्यांनी नवीन बांधकामाला परवानगी दिली की परवानगीची एक प्रत वसुली विभागाला द्यावी. वसुली विभाग त्यावर लगेचच मालमत्ता कर आकारणीच्या दृष्टीने कायदेशीर पूर्तता करील. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. पुरातत्व वास्तुच्या ३०० मीटर परिसरात बांधकाम करता येत नाही. पण शहरात असे बांधकाम झाले आहे. पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार करून हे बांधकाम नियमित करता येते का? याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर या मालमत्ताधारकांकडूनही कर वसूल केला जाणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी म्हणाले.