राजूर, श्रीगोंदा परिसरात वादळी पाऊस

By Admin | Updated: May 28, 2014 00:13 IST2014-05-27T23:48:02+5:302014-05-28T00:13:04+5:30

राजूर : रोहिणीच्या पहिल्याच वादळी पावसाने राजूर परिसरास जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांचे पत्रे व कौले उडाली.

Rainfall in rainy season in Rajur, Shrigonda | राजूर, श्रीगोंदा परिसरात वादळी पाऊस

राजूर, श्रीगोंदा परिसरात वादळी पाऊस

राजूर : रोहिणीच्या पहिल्याच वादळी पावसाने राजूर परिसरास जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांचे पत्रे व कौले उडाली. शेकडो झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विजेचे खांबही भुईसपाट झाले. मंगळवारी सकाळपासूनच हवेत मोठा उकाडा होता. दुपारी दोन अडीचच्या सुमारास ढग जमा होण्यास सुरुवात झाली. पावसाबरोबरच जोरदार वारे वाहू लागले. वार्‍याचा वेग एवढा प्रचंड होता की, जामगाव परिसरातील शेकडो झाडे उन्मळून पडली तर अनेक झाडे मोडून पडली. याच गावातील अनेकांच्या घरावरील कौले उडून गेली. तर दादाभाऊ भावका महाले, रंजना बाळू महाले यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे संसारोपयोगी सर्व साहित्य पाण्याखाली गेले होते. अचानक बरसलेल्या जोरदार पावसाने काही शेतकर्‍यांचे बांधही फुटले. साठवलेल्या कांदा चाळीमध्येही पाणी घुसले. रजाूरमध्येही संजय पुंजाराम वालझाडे यांच्या घराचे पत्रे तर बाळू विठ्ठल लहामगे यांच्या घरावरील सर्वच कौलेही उडाली. यांच्याही घरात पाणीच पाणी झाले. मीराबाई भारमल यांच्यासह इतर ग्रामस्थांचीही कौले, पत्रे उडाली. ग्रामविस्तार अधिकारी आर.एस. भोर, कामगार तलाठी रामदास उगळे यांनी भेट देत पंचनामे केले. पावसाबरोबरच सुसाट वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे अनेक मोठमोठे वृक्ष मोडले तर काही उन्मळूनही पडले. यातील अनेक झाडे वीज वाहिणींच्या तारांवरच कोसळल्यामुळे अनेक पोल भूईसपाट झाले. त्यामुळे आंबित फीडरवरील अनेक गावे अंधारात राहणार आहे. जामगाव, पाडाळणे, चिंचवणे परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली. त्याचा परिणाम टोमॅटो, चवळी व इतर भाजीपाला पिकांवर होणार असल्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली. जामगाव येथील काशीनाथ मेंगाळ यांची विहीरही आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात गाडली. या परिसरात पावसाचा जोर एवढा मोठा होता की, एक तासभरानंतर पाऊस उघडला तरी त्यानंतर एक तासाहून अधिक वेळ शेत जमिनींमधून वेगाने पाणी वाहत होते. आजच्या वादळी पावसाने सर्व पत्रे उडवून दिले. धान्याच्या पोत्यांसह पडवीतील कांदा पूर्ण पाण्याखाली गेल्याचे जामगाव येथील दादाभाऊ महाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राजूर येथील कुसुम पुंजाराम वालझाडे, सविता वालझाडे, आर्या राजेंद्र वालझाडे किरकोळ जखमी झाले. श्रीगोंदा : श्रीगोंदा शहराला मंगळवारी वादळी वार्‍याचा तडाखा बसला. संतोष निगडे यांच्या पाच दुकानाचे पत्रे उडून गेले. मांडवगण व साळवणदेवी रोडवरील विजेचे खांब पडले त्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. आढळगाव रोडवरील संतोष निगडे यांच्या दुकानामध्ये वादळी वारे घुसले आणि पत्र्याचे छत उडून लावले. हे छत निसर्ग हॉटेलसमोर पडले. सुदैवाने कोणतीच जीवित हानी झाली नाही. शहरातील भटक्याची पाले उडून गेली. इंदिरानगर, सिद्धार्थनगर मधील काही घराचे नुकसान झाले आहे, साळवणदेवी रोडवर विजेचे खांब पडले आणि तारा रस्त्यावर आल्या. नशीब बलवत्तर म्हणून विजेचा कुणालाच धक्का बसला नाही. माजी नगराध्यक्ष भागचंद घोडके यांच्या घरावर झाड पडले. परिक्रमाचे सचिव विक्रमसिंह पाचपुते, नगरसेवक भरत नाहाटा, प्रशांत दरेकर, बापू गोरे, माजी उपनगराध्यक्ष नाना कोथिंबिरे यांनी घटनास्थळास भेट देऊन मदतकार्य केले. गेल्या वर्षापासून दुष्काळ अतिवृष्टी, गारपीट व अवकाळी पाऊस वादळी वार्‍यासारख्या अस्मानी संकटाचा श्रीगोंदेकरांना सामना करावा लागत आहे.

Web Title: Rainfall in rainy season in Rajur, Shrigonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.