मतदार याद्यांसंदर्भात हरकतींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST2021-02-24T04:23:21+5:302021-02-24T04:23:21+5:30
शेवगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत प्रभागनिहाय मतदार याद्यांसंदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार ...

मतदार याद्यांसंदर्भात हरकतींचा पाऊस
शेवगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १५ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत प्रभागनिहाय मतदार याद्यांसंदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ हजार ९०५ मतदारांनी तब्बल १९ हजार ५८६ हरकती नोंदवल्या आहेत. या हरकतींचा निपटारा करण्यासाठी प्रशासक देवदत्त केकाण कार्यालयात तळ ठोकून आहेत.
शहरातील २१ प्रभागांतील ३१ हजार ४५० मतदारांपैकी १९ हजार ५८६ हरकती आल्याने मोठ्या प्रमाणात मतदारांचे प्रभाग बदलले गेल्याचे स्पष्ट होत आहे. सर्वात कमी प्रभाग क्रमांक १ मधून केवळ ५ जणांनी ८ हरकती दाखल केल्या, तर सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक १६ मध्ये दाखल झाल्या असून, ९४ जणांनी ३ हजार ३२५ हरकती नोंदवल्या. त्यात बहुसंख्य त्याचं त्याच हरकती असल्याचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले.
तर खालोखाल प्रभाग क्रमांक ७ मध्ये ७९ जणांनी २ हजार १०६ तर प्रभाग २० मध्ये ४१८ जणांनी १ हजार १४६ हरकती घेतल्या आहेत. प्रभाग एक वगळता अन्य प्रभागात तीनशे, पाचशे ते सहाशे हरकती दाखल आहेत.
प्रभाग सोळामध्ये २ हजार २६६ इतकी मतदार संख्या असताना ३ हजार ३३५ हरकत अर्ज दाखल झाल्याने या प्रभागात मतदार याद्यांसंदर्भात बराच गोंधळ झाल्याचे समोर येत आहे. तर प्रभाग सातमध्ये १ हजार ५९० मतदार संख्या आहे. त्यामध्ये तब्बल २ हजार १०६ हरकती दाखल झाल्याने याही प्रभागात मतदारांचे प्रभागात बदलले गेल्याचे हरकतीच्या आकडेवारीवरून दिसून येते. तीच परिस्थिती प्रभाग २० मध्ये आहे.
दरम्यान, १ मार्चपर्यंत अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिध्द कराव्या लागणार आहेत.