नगर तालुक्यात १ लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 14:42 IST2018-09-20T14:41:59+5:302018-09-20T14:42:17+5:30

पावसाअभावी खरीप पिकांची वाताहत झाल्याने नगर तालुक्यातील शेतक-यांच्या आशा रब्बीवर टिकून होत्या. मात्र परतीच्या पावसाने चांगलेच ताणल्याने तालुक्यातील रब्बीच्या पेरण्या सुमारे १५ दिवस लांबल्या आहेत.

Rabi planning in 1 lakh hectare in Nagar taluka | नगर तालुक्यात १ लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन

नगर तालुक्यात १ लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन

केडगाव : पावसाअभावी खरीप पिकांची वाताहत झाल्याने नगर तालुक्यातील शेतक-यांच्या आशा रब्बीवर टिकून होत्या. मात्र परतीच्या पावसाने चांगलेच ताणल्याने तालुक्यातील रब्बीच्या पेरण्या सुमारे १५ दिवस लांबल्या आहेत. गेल्या एक दोन दिवसात तालुक्यात काही भागांचा अपवाद वगळता चांगला पाउस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला गुंतले आहेत. वापसा होताच पेरण्या सुरु होणार असल्या तरी अजून विहिरी व तलाव कोरडेच असल्याने तालुक्यात आणखी पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यात १ लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे.
दुष्काळी नगर तालुक्यात यंदा सुरुवातीला पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम जवळपास कोरडा गेला. मुग व इतर कडधान्ये यांचे उत्पादन निम्म्याने घटले. तालुक्याच्या आशा परतीच्या पावसावर टिकून असल्याने शेतकरी या पावसाची अनेक दिवसापासून वाट पाहत होते. मात्र परतीचा पाऊसच लांबल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. नगर तालुका रब्बीचा तालुका असल्याने या पावसावरच शेतक-यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गेल्या एक दोन दिवसात तालुक्यात सवर्दूर पाउस सुरु झाल्याने शेतकरी सुखावला आहे. बहुतांशी भागात पेरणी योग्य पाउस झाल्याने आता शेतात वापसा होताच पेरण्या सुरु होणार आहेत.शेतकरी वापसा होण्याची वाट पाहत आहेत. तालुक्यातील चिचोंडी पाटील व परिसरातील काही गावात अजून पेरणी योग्य पाउस नसल्याने शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. तालुक्यात १ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले आहे.
तालुक्यात पेरणी योग्य पाउस झाला असला तरी अजून जोरदार पावसाची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. तालुक्यात विहिरी व तलाव अजून कोरडेच असल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चा-याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. तालुक्यात जवळपास १५२ पाझर तलाव आहेत ते अजून कोरडेच आहेत. तसेच जलयुक्त शिवार योजना व पाणी फौंडेशन च्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास ५५ गावात जलसंधारणचे काम झाले आहेत. नदी खोलीकरण, रुंदीकरण, बांध बंदिस्ती, समतल चर, बंधारे घालून पाणी अडवण्यासाठी गावे सज्ज झाली आहेत. मात्र यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने नगर तालुका दुष्काळाच्या सावटात आहे. सध्या रब्बीच्या पेरणीचा प्रश्न सुटल्याने शेतकरी काहीसे समाधानी आहेत.

असे आहे रब्बीचे नियोजन
ज्वारी : ८० हजार हेक्टर, गहू-४ हजार हेक्टर, हरबरा-३ हजार ७०० हेक्टर, मका : ६०० हेक्टर

तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाउस झाला तर लागवडीत वाढ होऊ शकते. पावसाअभावी रब्बीच्या पेरण्या लांबल्या. मात्र ज्या ठिकाणी पावसा झाला असेल तेथे शेतक-यांनी पेरण्या उरकून घ्यावात. - बाळासाहेब नितनवरे, तालुका कृषी अधिकारी

पेरणी योग्य पाउस झाला असला तरी अजून आमच्या विहिरी कोरड्या आहेत. जनावरांच्या चा-याचा प्रश्न अजून आहेच. आणखी जोरदार पावसाची गरज आहे.नाहीतर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.—लहानू ज-हाड , शेतकरी, निंबळक

झालेला पाउस खूप समाधानकारक नाही. तालुक्यात आणखी पावसाची गरज आहे. तरच दुष्काळाचे सावट दूर होऊ शकते. पेरण्या झाल्यांनतर हि पावसाची मोठी गरज आहे. — राघू चोभे, शेतकरी,बाबुर्डी बेंद

Web Title: Rabi planning in 1 lakh hectare in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.