भावीनिमगावात दरोडा; मारहाणीत दोन जखमी
By Admin | Updated: June 26, 2014 00:46 IST2014-06-26T00:09:18+5:302014-06-26T00:46:51+5:30
शेवगाव : तालुक्यातील भाविनिमगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोराच्या टोळीने धुमाकूळ घातला. देशमुख वस्तीवरील सुधीर जगन्नाथ कबाडी व त्यांच्या भावास मारहाण करून जखमी केले.
भावीनिमगावात दरोडा; मारहाणीत दोन जखमी
शेवगाव : तालुक्यातील भाविनिमगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोराच्या टोळीने धुमाकूळ घातला. देशमुख वस्तीवरील सुधीर जगन्नाथ कबाडी व त्यांच्या भावास मारहाण करून जखमी केले. त्यांच्या घरातून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा मोठा ऐवज घेऊन ही टोळी पसार होण्यात यशस्वी ठरली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या शेवगाव पोलीस पथकाने दरोडेखोराच्या टोळीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोटारसायकलवरून पळून जाण्यात ही टोळी यशस्वी ठरल्याने पोलीस पथकाच्या कारवाईस यश मिळाले नाही.
भाविनिमगाव येथील शेतकरी जगन्नाथ कबाडी हे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गड्यासमवेत घरी पोहचल्यानंतर ओट्यावर उभे राहिले असता दरोडेखोराच्या टोळीपैकी काहींनी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना खाली पाडले व घरातून ऐवज काढून देण्याची इतर सदस्यांना सूचना करावी, अशी दमबाजी सुरू केली. यावेळी एकाच्या गलोलीचा दगड त्यांच्या तोंडावर बसल्याने ते जखमी झाले.
घरात असलेल्या पत्नी, भाऊ, मुलगा व सून अशा इतर सदस्यांनी मारू नका, अशी विनवणी करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व काही रोख रक्कम काढून दिल्यानंतर दरोडेखोरांची ही टोळी अंधाराचा फायदा घेऊन निघून गेली. त्यानंतर नगर येथे सिव्हील इंजिनियर असलेल्या सुधीर कबाडी यांनी शेवगाव
पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक अजित लकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले, पोलीस कर्मचारी संजय बडे, ज्ञानेश्वर माळवे आदींच्या पथकाने घटनास्थळी जावून चोरट्याच्या टोळीचा पाठलाग सुरू केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन ही टोळी मोटारसायकलवरून पसार होण्यात यशस्वी ठरली. या घटनेत दोन जणांना मार लागला असून, त्यांच्यावर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)
दरोडेखोरांची संख्या पाच ते सहा असून ते २५ ते ४० वयोगटातील होते. त्यांनी तोंड बांधलेले होते. ते हिंदी व मराठीतून बोलत होते असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात तसेच वाड्यावस्त्यावर वस्तीकरून राहणाऱ्या शेतकऱ्यात चिंतेचे व घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.