इडा-पीडा टळण्यासाठी पूजा
By Admin | Updated: May 26, 2014 00:24 IST2014-05-26T00:03:44+5:302014-05-26T00:24:47+5:30
अहमदनगर : जो शरण जात नाही, तो पोलीस कसला? असेच पोलिसांच्याबाबत म्हटले जाते. मात्र कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी दत्तात्रयाला शरण गेले.

इडा-पीडा टळण्यासाठी पूजा
अहमदनगर : जो शरण जात नाही, तो पोलीस कसला? असेच पोलिसांच्याबाबत म्हटले जाते. मात्र कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी दत्तात्रयाला शरण गेले. तक्रार घेऊन येणार्यांना पोलिसांना शरण जावे लागते. मात्र इथे पोलीसच शरण गेले. कर नाही त्याला डर कशाला असे म्हणतात. मग पोलिसांना भीती कशाची आली?असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुरुवारचा मुहूर्त बघून कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या उंबराच्या झाडाखाली श्री दत्तात्रयाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून सत्यनारायण महापूजा घालण्यात आली. कोणी म्हणाले, दत्तजयंती केली, कोणी म्हणाले, गुरुवारची पूजा केली, कोणी म्हणाले, पोलीस ठाण्याची इडा-पीडा टळावी म्हणून पूजा केली. उत्तरे काहीही असो, मात्र गेल्या गुरुवारी दत्ताची पूजा मात्र झाली. कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. टी. पवार यांना घालविण्यासाठी पोलीस कर्मचारी सक्रिय झाले होते. ते गेले, आता त्यांच्याजागी बाळकृष्ण हनपुडे काम पाहत आहेत. काहींना तेही नको आहेत, तर काहींना हवे आहेत. कोणीही या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये असेच राहते. कोतवाली पोलीस ठाण्यातील सारीच भिस्त शिपायांच्या हाती आहे. जितेंद्र भाटिया हत्या प्रकरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे यांना त्यांची काहीच चूक नसताना निलंबित व्हावे लागले. खून करण्याची पूर्ण तयारी करणारा खंडणीच्या नावाखाली पोलिसांना गुंगारा देत होता. अशावेळी पोलीस तरी काय करणार? यामध्ये तक्रार घेतली नाही म्हणून अहिरे यांच्यावर त्यांची काहीच चूक नसताना कारवाई झाली. त्यानंतर दोन पोलीस अधिकारी लाचेच्या जाळ््यात अडकले. अनेक दिवसांपासून त्यांना अडकवयाचेच होते, तेच नेमके सापडले. वसुली अधिकार्यांचीच विकेट गेल्याने अधिकारीही धास्तावले आहेत. कोणत्याही कारणाने का होईना कोतवाली पोलीस ठाणे सर्वांचेच लक्ष्य झाले होते. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याला लागलेली इडा-पीडा, येणारी संकटे निवारण व्हावीत, म्हणून दत्ताची पूजा करण्यात आल्याचे पोलीस कर्मचारी सांगत आहेत. चांगले काम करण्याची, सामान्य माणसाला न्याय देण्याची ,गुन्हेगारांना ठेचून काढण्याची,पोलीस ठाण्याची प्रतिष्ठा उंचावण्याची बुद्धी पोलिसांना दिली तरी ही पूजा सफळ झाली, असे म्हणावयास हरकत नाही.(प्रतिनिधी)