भगवानगडाच्या प्रवेशद्वारात पोलिसांवर दगडफेक
By Admin | Updated: October 12, 2016 01:10 IST2016-10-12T00:38:53+5:302016-10-12T01:10:39+5:30
अण्णा नवथर / उमेश कुलकर्णी , भगवानगड पंकजा मुंडे व नेत्यांनाच दर्शनासाठी गडावर सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामळे तणाव निर्माण होऊन पोलिसांवर चपला व दगडफेकीचा प्रकार घडला.

भगवानगडाच्या प्रवेशद्वारात पोलिसांवर दगडफेक
अण्णा नवथर / उमेश कुलकर्णी , भगवानगड
पंकजा मुंडे व नेत्यांनाच दर्शनासाठी गडावर सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामळे तणाव निर्माण होऊन पोलिसांवर चपला व दगडफेकीचा प्रकार घडला. यावेळी जमाव नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली़ त्यामुळे गडाच्या पायथ्याशी मेळावा झाला. पावणे एक वाजता पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टर गडाच्या पायथ्याशी उतरले. तत्पूर्वीच महादेव जानकर, सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले होते. पंकजा यांच्या हेलिकॉप्टरने नेहमीप्रमाणे गडाला दोन फेऱ्या मारल्या. त्या वेळी जमलेल्या जनसमुदायाने जल्लोष केला. त्यानंतर त्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आणलेल्या रथातून गडावर दर्शनासाठी गेल्या. गडाच्या रस्त्यावर व प्रवेशद्वारावर मुंडेसमर्थकांची प्रचंड गर्दी होती. मुंडे गडावर पोचण्यापूर्वी आतील सर्व भाविकांना पोलिसांनी बाहेर काढत आतील सर्व परिसर एकप्रकारे निर्मनुष्य केला. केवळ मुंडे व नेत्यांनाच आत प्रवेश देण्याची भूमिका घेतल्याने समर्थकांनी आक्षेप घेतला. आम्हालाही आत प्रवेश हवा अन्यथा मुंडे यांनी आत न जाता प्रवेशद्वारावरच भाषण करावे, अशी भूमिका समर्थकांनी घेतली. त्यामुळे गोंधळ झाला.
जमाव रथाकडे झेपावर होता. अर्धा तास मुंडे व नेते रथातच थांबून होते. अखेर नेत्यांनाच आत सोडण्यात आले. त्यानंतर बाहेर पोलिसांवर चप्पल व दगडफेक झाली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस महानिरीक्षक हे स्वत: यावेळी जमाव नियंत्रित करत होते. दर्शनानंतर नेते गडाच्या खाली मेळाव्यासाठी आले.
महंत नामदेवशास्त्री यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीभोवती पोलिसांचे कडे होते. या निवासस्थानाकडे कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. मेळाव्यानंतरही प्रवेश बंदी होती.
भगवानगडावरील मेळाव्यासाठी व्यासपीठावर तीन मंत्री, दोन खासदार व पाच आमदारांची उपस्थिती होती. आमदारांमध्ये नगर जिल्ह्यातील शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे व बाळासाहेब मुरकुटे, बीड जिल्ह्यातील भिमराव धोंडे, संगीता ठोंबरे, आर.टी. देशमुख व बुलढाण्याचे आमदार संजय कुटे यांचा समावेश होता. माजी आमदार गोविंद केंद्रे, औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड, फुलचंद कराड, डॉ. अमित पालवे, ज्ञानोबा मुंडे, सर्जेराव तांदळे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘आली रे आली वाघीण आली, पंकजाताई तुम आगे बढो’ अशा घोषणांनी गडाचा परिसर दणाणून गेला होता. सभास्थळापासून खरवंडीच्या दिशेने पाच किलोमीटरपर्यंत,दैत्यनांदूरच्या दिशेने चार किलोमीटर, तर घोगस पारगावच्या दिशेने पाच किलोमीटरपर्यंत रस्त्याने गर्दी व वाहनांच्या रांगा होत्या. गडावरुन खाली सर्वत्र वाहने व माणसे दिसत होती. मेळाव्यासाठी अनेकजण झाडांवर व डोंगरावर जागा मिळेल तेथे बसत होते. दरवर्षी मेळाव्यात जेवणाची व्यवस्था असते. यावर्षी मात्र गडावर जेवणाची व्यवस्था नसल्याने अनेकांनी ट्रस्टबाबत नाराजी व्यक्त केली.
भगवानगडाने राज्यात सत्तापरिवर्तन केले आहे. अठरापगड जातींना गोपीनाथ मुंडे यांनी या गडावरून एकत्र केले. मागील वेळी मी गडावर आलो होतो, त्या वेळी पंकजा यांनी पुढील वेळी जानकर व खोत हे मंत्री म्हणूून दसऱ्याला सोने लुटायला येतील, असे सांगितले होते. तसेच घडले असून, पंकजा यांना कोणीही एकटे पाडू शकत नाही. वाघासारखे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही भगवानबाबांना मानतो त्यांच्या दलालांना नव्हे. दसऱ्याला अड्यावरून खाली काढलेली शस्त्रे वापरायला लावू नका, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. राम शिंदे यांनीही आपणाला पंकजा यांच्यामुळेच जलसंधारण खाते मिळाले असल्याचे सांगितले. तर राज्यात गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे सत्तांतर घडले असून, आमच्यासारख्या अनेकांना त्यांनी ताकद दिल्याचे खासदार राजू शेट्टी म्हणाले.
आपणही दरवर्षी भगवानगडावर येतो. त्याचमुळे आपणाला कॅबिनेटमंत्रिपदी बढती मिळाली.पंकजा यांच्यामुळेच जलसंधारण खाते मिळाले. त्यांनी आता पायथ्यापासून काम सुरु केले असल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले.
भगवानगड हे आमचे दैवत असल्याचे सांगून पंकजा मुंडे या गडाच्या कन्या आहेत़ मात्र त्यांनाच गडावर सभा घेण्यास नकार देण्यात आला़ त्यामुळे महंतांच्या विरोधातील बंड असून, लेकीचा तळतळाट कसा असतो, ते महंत नामदेवशास्त्री यांना कळेल़
मंगळवारी सकाळी पाथर्डी तालुक्यासह राज्याच्या विविध गावांतून आलेले भाविक टेम्पो, जीप आदी वाहनांतून भगवानगडाकडे जात असल्यामुळे पाथर्डी -खरवंडी तसेच पाथर्डी -कोरडगाव या रस्त्यांवर अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली. वादाच्या पार्श्वभूमीवर तरुण मोठ्या संख्येने मेळाव्याला आले होते. दर वर्षीच्या तुलनेत तणावपूर्ण वातावरणामुळे चालूवर्षी महिलांची उपस्थिती अत्यंत कमी होती. प्रशासनाने गडाच्या पायथ्यापासून तिन्ही रस्त्यांवर सुमारे एक किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे भक्तांंना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. आलेले भाविक महंत डॉ. नामदेवशास्त्रींविरोधात नाराजी व्यक्त करीत होते.